भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीपुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली .
भिगवण आणि परिसरात वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमाना मुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच अति गंभीर रुग्णाला उपचारासाठी बारामती अथवा पुणे येथे पाठविणे रुग्णवाहिका विना जिकिरीचं होत होत .
जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर
तर मागील आठवड्यात रुग्णाला रुग्णवाहिका न मिळाल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता .
याच कारणामुळे भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अंबुलन्स मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केली होती .याच मागणीची दखल घेत आज पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी 51 रुग्णवाहिका वितरित केल्या .
यात भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका वितरित करण्यात आली .
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वितरित करण्यात आलेली रुग्णवाहिका
रुग्णवाहिका मिळाली असल्यामुळे भिगवण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून हे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांचे यश मानले जाते .त्यामुळं भिगवण कर नागरिक बंडगर यांचे आभार व्यक्त करीत आहेत.
भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी तक्रारदार अशोक भास्कर भोसले यांनी बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात दि.१२ /०९ /२०२० रोजी डाळज नंबर ता.इंदापूर येथील अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील तक्रारदार अशोक भास्कर भोसले यांच्यावर आरोपी प्रदीप दौलत जगताप ,अमोल सुभाष जाधव ,हनुमंत शिवाजी जगताप ,रोहन तानाजी जगताप ,रोहित तानाजी जगताप सर्वजण रा.डाळज यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.यावेळी मुख्य आरोपी प्रदीप दौलत जगताप याला भिगवण पोलिसांनी अटक केले होते.
त्याची न्यायालयने सदर आरोपीस जामीन देत असताना संदर्भीय केसचा निकाल लागे पर्यंत त्याच्या राहत्या गावी म्हणजे डाळज येथे जाता येणार नसल्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.
मात्र भिगवण पोलिसांनी इतर ४ आरोपींना १० दिवस उलटूनही अटक करण्यात आली नाही.त्यामुळे फिर्यादी भोसले यांनी बारामती उविभागीय अधिकारी शिरगावकर यांची भेट घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली.
तसेच मुख्य आरोपी हा रात्रीच्या वेळेत प्रतिबंध केलेल्या राहत्या घरी येत असल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली.तसेच यातील आरोपी हे गावात राजरोष पणे फिरत असून त्यांना पोलीस प्रशासनाने तातडीने अटक करून न्याय देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद चीतारे यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करीत तातडीने अटक न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे सांगितले.तर अॅट्रासिटी सारख्या संवेदनशील गुन्ह्यात पोलिसांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले…
भिगवण वार्ता.२५ भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० च्यावर नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन देण्यात आली.वाफेच्या मशीनची अजूनही नागरिकांनी मागणी केल्यास ती ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतोष धवडे यांनी दिली.
भिगवण आणि परिसरात कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.तर अनेकवेळा फवारणी करण्यात आली आहे.
भिगवण शहरात आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने खबरदारीचे उपाय योजना करण्यात आल्या आहेत.तर नागरिकांना अन्नधान्याची आणि भाजीपालाची कीट हि राष्ट्रवादीच्या वतीने वाटण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणून भिगवण गावच्या सरपंच अनिता धवडे यांनी नागरिकांना वाफेचे मशीन कमी किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायत आणि भिगवण गावातील काही दानशूर व्यक्ती आणि संघटना यांच्या मदतीने प्रयत्न केले.आणि त्यांच्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर यश लाभून भिगवण गावातील जवळपास ९०० नागरिकांना अगदी नाममात्र १०० रुपये किमतीत वाफेचे मशीन उपलब्ध करण्यात आले.
या वाफेचे मशीन वितरणाच्या वेळी सरपंच अनिता संतोष धवडे ,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे ,प्रशांत भाऊ शेलार ,माजी सरपंच पराग जाधव ,हेमाताई माडगे ,संदीप वाकसे ,रेखाताई पाचागने तसेच सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी हनुमंत चांदगुडे ,अमोल वाघ ,बाळासाहेब जगताप ,नाना गायकवाड तसेच ग्रामविकास अधिकारी परदेशी उपस्थित होते.
भिगवण शहरात कोरोना आजाराचा फैलाव होवू नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिक अथक प्रयत्न केल्यामुळेच भिगवण येथील रुग्णाची संख्या मर्यादित राहिली.
मात्र भिगवण परिसरात अनेक गावातील वाढत्या रुग्ण संखेमुळे कोविड सेंटर मध्ये उपचार आणि विलगीकरण यांची संख्या वाढलेली दिसते.
भिगवण वार्ता.दि.२४ भिगवण पोलिसांनी चोरट्या वाळू उपशावरील कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावच्या पोलीस पाटील यांच्यावर टाकल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.
कोरोनाच्या कामामुळे आधीच त्रासून गेलेल्या पोलीस पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून “ घरचे झाले थोड आणि व्याह्याने धाडले घोडे ”असे म्हणायची वेळ आल्याचे दिसून येत आहे..
भिगवण पोलिसांनी गुरवारी पहाटे धाडसी कारवाई करीत जवळपास १२ लाख रुपयाच्या बोटी आणि फायबर ताब्यात घेतले.यावेळी याची माहिती महसूल विभागाला देत या जप्त केलेल्या बोटी आणि फायबर जिलेटीन च्या सहायाने उडवून देण्यात आल्या.तर या कारवाईत जवळपास २८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.या वाळूची किमत जवळपास १ लाख ५० हजार रुपयाच्या घरात आहे .
हे साठे उजनी जलाशयाच्या किनारी असून ते महसूल विभागाने ताब्यात घेत पंचनामा केला आहे.तसेच या वाळू साठ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावचे पोलीस पाटील अमर सुरेंद्रकुमार धुमाळपाटील यांच्याकडे दिली आहे.या संदर्भात धुमाळपाटील यांना गावकामगार तलाठी महादेव श्रीराम भारती यांनी पत्राद्वारे ताबा दिला आहे.
पुढील आदेश होई पर्यंत वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांची असून यामुळे पोलीस पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी महसूल विभागाने जप्त केलेली मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली असून ती योग्य रीतीने पार पाडणार असल्याचे सांगितले.
तर सोशल मिडिया वर या मालमत्ता चोरी केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आवाहन धुमाळपाटील यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे .
कोरोना आजारात भिगवण पोलीस कोविड योद्धा म्हणून काम असतानाच मस्तावलेल्या वाळू माफियांनी मांडलेला उछाद अखेर भिगवण पोलिसांच्या धाडसी कारवाई मुळे थंडावला असल्याचे दिसून आले.भिगवण पोलीस ठाण्याच्या सिंघम अधिकारी जीवन हिंदुराव माने यांनी आज केलेल्या कारवाईत वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला.
तर ही कारवाई नुसती सुरवात असल्याचे सांगून अजूनही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सत्यवार्ताशी बोलताना सांगितले. भिगवण पोलीस ठाण्याचे इन्कलाब रशीद पठान यांनी दिलेल्या माहिती नुसार शासनाची कोणत्याही प्रकारे परवाना नसताना आणि कोणत्याही प्रकारची रॉयलटी भरली नसताना दोन अवाढव्य फायबर आणि बोटी उजनी धरणाच्या पाण्यातून वाळू उपसा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
याबाबत खातरजमा करण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी पथकाला सोबत घेत बुधवारीच्या मध्यरात्री उजनीच्या जलाशयात तपासणी सुरु केली.यावेळी भिगवण पोलिसांनी धाडसाने या बोटीवर प्रवेश करीत ताबा मिळविला.
या बोटीतील आठ कामगार आणि तीन बोटी मालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.याबाबत शौकत कमरुद्दीन शेख वय ३२ ,बहुद्दिन मुजालीम शेख ,वय २० ,रफिक दानेश शेख .वय.३२ ,हनन बजरुद्दिन शेख मनीरूल कामुरुद्दिन शेख ,रोहित शेख सर्वजण झारखंड येथील आहेत.तर बोट मालक सोन्या बाळासाहेब सरक वय २५ रा.कात्रज ता.करमाळा ,ज्ञानेश्वर शिवाजी सोळंखे रा.विरवाडी मदनवाडी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भिगवण पोलिसांची वाळू माफिया वर जोरदार कारवाई
यातील सात आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायलयात रवानगी केली आहे.तर बोट मालक आणि चोरीसाठी मदत करणारांची भिगवण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. भिगवण पोलिसांनी या कारवाईत पकडलेल्या बोटी महसूल विभागाच्या माध्यमातून बोटी नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी दिली.
भिगवण पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक करण्यात येत असले तरी महसूल विभाग नक्की काय करतोय असा सवाल विचारला जात आहे .तर ज्यांच्या जागेचा वापर करून चोरीची वाळू वाहतूक केली जात आहे असा वनविभाग दाखविण्यासाठी कारवाई करीत असल्याचे या परिसरातील शेतकरी सांगत आहे याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी उजनी धरणातील वाळूचोरी विरोधात यापुढेही जोरदार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती आणि इंदापूर शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यावतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील भिगवणमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास आज (दि.१९) पासून सुरुवात करण्यात आली आहे.
आज (दि.१९) भिगवण येथे ३६ पथकांद्वारे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सीमीटर, पल्समीटर व थर्मामीटर च्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली आहे. जे नागरिक तपासणीवेळी ज्या- ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून येतील, त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या आणि ज्यांना आपली टेस्ट करून घ्यावी वाटते अशाची अँटी जेन टेस्ट भैरवनाथ हायस्कुल भिगवण येथे सुरवात करण्यात आली आहे. जेणेकरून भविष्यात वाढणार धोका टळेल व कोरोणा नियंत्रणात येण्यास मदत होईल.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी ,जि.प सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे , सचिन बोगावत, अजिंक्य माडगे, मनोज राक्षे, गाव कामगार तलाठी गाडेकर,आरोग्य अधिकारी दिलीप जगताप , डॉ. मृदुला जगताप ,आरोग्य सेवक झगडे आदी उपस्थित होते
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे बॅकवाॅटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदानच आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम- सुफलाम झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोऱ्यात ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरल्याने या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण तुडुंब भरले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस शंभर टक्के भरलेले उजनी धरण यंदा मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीस शंभर टक्के भरले आहे.
सोलापुर, अहमदनगरसह पुणे जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता 123 टीएमसी एवढी प्रचंड आहे. राज्यात सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. हे धरण राज्यातील तिसर्या क्रमांकाचा उपयुक्त साठा पाणी साठा असलेले धरण आहे. उजनी धरणाचा एकूण जलसाठा 110.89 एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र 53.57 टीएमसी एवढा आहे.
धरण जेव्हा शंभर टक्के भरले असे आपण म्हणतो तेव्हा धरणात 117 टीएमसी पाणी साठा असतो तर 111 टक्के भरलेले तेव्हा 123 पाणी साठा असतो. उजनी धरणातील बँकवाँटरचे पाणी हे करमाळा, इंदापूर, कर्जत , दौंड, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतीसाठी वरदान आहे.
दौंड तालुक्यातील पुर्व भागातील नदी किनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीच्या बँकवाँटरचे पाणी मिळत असल्याने या गावाची शेती सुजलाम सूफलाम झाली आहे.
हा भाग अंतिम टोकाला (टेल) असल्याने खडकवासला कालव्याचे पाणी या भागात येत नाही. अथवा जरी आले तरी टोकाचा भाग असल्याने या भागात पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी उजनी धरणातील बँकवाँटरच्या पाण्यावरच आपली शेती करतो. या गावातील अर्थकारणच उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. या भागात जरी कमी पाऊस पडला तरी चालेल परंतु पुण्याच्या धरण साखळी परिसरातील पावसावरच उजनीचे भवितव्य अवलंबून असते.
दरम्यान यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता उजनी धरण काठोकाठ भरल्याने शेतकरीवर्गाच्या चेहर्यावर आनंदाचे वातावरण आहे. नदीकाठच्या गावातील नागरिक काठोकाठ भरलेल्या भीमा नदीचे विहंगम दृश्य पहाण्यासाठी नदीकिनारी गर्दी करत आहेत.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर
भिगवण बारामती हा नेहमीच जादा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राज्यमार्ग . मात्र भिगवण ते शेटफळगढे दरम्यान च्या परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता अपघात प्रणव समजला जातो . याठिकाणी अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व मिळाले आहे .परंतु आता त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना या त्रासातून लवकरच मुक्ती मिळणार आहे.
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने या रस्त्यासाठी अकरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बारामती एमआयडीसी तसेच परिसरातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखाने यामुळे सातत्यानं या रस्त्याने अवजड वाहतूक सुरू असते .अशातच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर मदनवाडी घाटातून वर चढणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची “सर्कस” पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला ही दरदरून घाम फुटावा अशीच परिस्थिती असते. त्यामुळे कारखाने सुरू असताना या परिसरात सातत्याने छोटे मोठे अपघात होतच असतात.
मध्यंतरीच्या काळामध्ये मदनवाडी घाटातील वळणावर इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश बापू जाधव यांचे अपघाती निधन झाले होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी आले होते तेव्हा या घाट रस्त्यावरील वळणे काढून टाकण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न चांगलाच मनावर घेतला.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईल.व कोरोनाचा हा संकटकाळ सरल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल. त्यानुसार या निधीतून जुन्या भिगवण पुलाजवळ नवीन पुलाची निर्मिती होणार असून त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यातून 47 मीटर लांबीचा व 12 मीटर रुंदीचा पुल या ठिकाणी बांधला जाणार आहे. तेथील झेड आकाराची वळणे काढून टाकली जाणार आहेत. तसेच मदनवाडी हद्दीतील ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुल पाडून तिथे चार कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधला जाणार आहे.
32 मीटर लांब व 12 मीटर रुंद आकाराचा हा पूल असणार आहे. तेथीलही झेड आकाराची वळणे काढून रस्ता सरळ केला जाणार आहे.तसेच मदनवाडी घाटातील 7 मीटर रुंदीचा रस्ता 10 मिटर रुंदीचा केला जाणार असून वळणे काढून रस्ता सरळ केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रवास लवकरच सुखकर झालेला पाहावयास मिळणार असून वाहनचालकांनाही दररोजच्या कराव्या लागणाऱ्या कसरतीतून मुक्तता मिळणार आहे.
अपघाती वळणे काढून टाकण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करीत इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती कै .रमेशबापू जाधव यांना राष्ट्रवादी पक्षाकडून एक प्रकारची श्रद्धांजली अर्पित करण्यात आली .
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी सर्वेक्षणात सहभाग घेत स्वतः नागरिकांची तपासणी केली आणि लक्षण असणाऱ्या नागरिकांनी रॅपीड ॲंटिजन टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
आज डाळज गावात २४५ कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण पल्स ऑक्सिमिटर, टेम्प्रेचर गणच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डाळज व प्राथमिक शिक्षक यांच्या ६ पथकाने केली यामध्ये गावातील नागरिकांनी सहकार्य केले गावात आजपर्यंत ३१ पेशन्ट कोरोना पोजिटीव्ही होते त्यातील ६ जण उपचार घेत आहेत व बाकीचे रुग्ण बरे झाले आहेत तर एकाची मयत झाली आहे.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत डाळज येथे सर्वेक्षण करताना जिल्हा परिषद सदस्य श्री. हनुमंत बंडगर
सर्वेक्षण मध्ये ४७ जण संशयित आढळ्याने त्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली यामध्ये २ जण पोजिटीव्ह आले.
अभियानात जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख ,विस्तार अधिकारी दिलीप जगताप, सरपंच विकास कुंभार उपसरपंच हनुमंत मेटे, कुमार परकाळे, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक जहांगीर मुलाणी, आरोग्य विभागाचे डॉक्टर व्यवहारे, समुदाय आरोग्य अधिकारी , मृदुला जगताप भगत, किर्ती व्यवहारे, टेस्टिंग लॅबचे पाळंदे, अशोक मोरे उपस्थित होत.
विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा
भिगवण वार्ताहर.दि.१०
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीला विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करण्यासाठी परवानगी दिली होती.
या दंडातून भिगवण आणि परिसरातील ग्रामपंचायत कडे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला हि रक्कम ग्रामपंचायत खात्यावर पडून असून या निधीचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
भिगवण कोरोना सेंटर मध्ये भिगवण रोटरी क्लब तसेच दत्तकाला स्कूल आणि भिगवण ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर यांच्या माध्यमातून बेड आणि गाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर रोजच्या खर्चाची जबाबदारी महसूल विभाग आणि भिगवण ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे.
तरीही अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत.त्यामुळे नागरिकांकडून विना मास्क साठी केलेला दंडाची रक्कम भिगवण कोविड सेंटर साठी वापरण्यात यावा अशी मागणी देहाडे यांनी केली आहे.तसेच भिगवण कोविड सेंटर मध्ये आयसी यु बेडची संख्या वाढविण्यात यावी आणि अम्बुलंस सेवा उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे.
भिगवण कोविड सेन्टरमध्ये उपचार घेण्यासाठी डिकसळ ,कुंभारगाव ,अकोले ,पोंधवडी ,तक्रारवाडी ,पिंपळे मदनवाडी ,मसोबावाडी ,शेटफळ येथील रुग्ण येत असतात तर या ग्रामपंचायती कडे लाखो रुपयाचा खात्यावर पडून आहे.
तर १५ वा वित्त आयोगातील रक्कम हि ग्रामपंचायत खात्यावर वर्ग करण्याची तयारी शासनाकडून चालू आहे.त्यामुळे कोरोना काळात जमा झालेली दंडाची रक्कम कोरोना सेंटर वर वापरण्यात यावा अशी मागणी देहाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.