Saturday, May 23, 2026
Home Blog Page 18

अतिक्रमणाचा महामेरू रोखणार कोण ? प्रशासनातील विभाग करताहेत टोलवाटोलवी

0

भिगवण वार्ताहर .दि.२८

भिगवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमणाचा महामेरू वाढत असताना प्रशासन मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्यामुळे अतिक्रमणाचा विषयाला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.आज ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत याची जाणीव प्रकर्षाने होत होती  .

भिगवण गावांतील अनेक महाराष्ट्र शासनाच्या जागा आणि शैक्षणिक उद्देशासाठी राखीव जागेवर अतिक्रमण होत आहे. ग्रामपंचायतीने सदर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावे असल्यामुळे महसुल व पुनर्वसन विभागाला अतिक्रमणाबाबत सांगूनही हा विभाग अतिक्रमणावर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्यासाठी सूचित करत असल्यामुळे यात काही राजकीय हस्तक्षेप आहे काय ? अशी संशयाची सुई उभी राहत आहे . शासनाच्याच विविध विभागांमार्फत अतिक्रमण वाढत असताना काढण्याच्या जबाबदारीवरुन सुरु असलेल्या टोलवाटोलवीबद्दल सामान्य नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे.राज्यात सुरू असणारी राजकिय परिस्थिती भिगवण मध्ये पाहण्यास मिळत असून सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीला ज्याप्रमाणे भाजप अडचणीत आणताना पहावयास मिळतो तसाच भिगवण मध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला कुराघोडी चा सामना करावा लागत असल्याचे या अतिक्रमण कारवाईत दिसून येत आहे .त्यामुळे अतिक्रमण करणारांची पोळी आपसुकच भाजत असून त्यामुळे सार्वजनिक जागांसह रस्त्यावरही अतिक्रमणे वाढली आहे.

येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये शैक्षणिक उद्देशासाठी राखीव जागेवर अतिक्रमण होत आहे. अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी असलेली मंदिरे, ज्ञानमंदिरे व समाजमंदिरे येथे जाण्यासाठीही नागरिक व विदयार्थ्यांना रस्ता शिल्लक नाही अशी स्थिती आहे. येथे अतिक्रमण होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने सबंधितास नोटीस देऊन व याबाबत महसुल व पुनर्वसन विभागास पत्रव्यवहार करुन सदर अतिक्रणावर कारवाई करावी असे सुचित केले होते. परंतु सदर जागा ही ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी असल्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करुन ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा प्रशासन त्यास सहकार्य करेल अशी भुमिका प्रशासनाने घेतली आहे. ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्त मागितला असता नेमका त्याच वेळेस पोलिस प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे पोलिस प्रशासनाने मनुष्यबळ पुरविण्यास असमर्थता दर्शविली आहे. हे सर्व सामान्य नागरिकांच्या आणि सुजाण ग्रामस्थांच्या लक्षात येत आहे .  शाळा, महाविदयालय, मंदिर व समाज मंदिर परिसरामध्ये होत असलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे.  शासनाच्या विविध विभागाकडुन करण्यात येत असलेली टोलवाटोलवी व दिरंगाई पाहुन अतिक्रमणाच्या पाठीमागे मोठा राजाश्रम तर नाही ना अशी शंका सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

महसुल, पुनर्वसन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी समन्वय साधुन ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.राजकीय डावपेच होत असताना गावाचे गावपण जपलं जावं आणि निदान गावातील रस्त्याच्या होत असलेल्या अतिक्रमना वर कारवाई करण्यासाठी तरी महसूल विभाग ग्रामपंचायत प्रशासन एकत्र येतील आणि त्यांना पोलीस संरक्षण देतील अशी आशा सर्वसामान्य नागरिक करत आहेत .

भादलवाडी गावच्या नवयुवकाची गळफास लावून आत्महत्या ; पोटाच्या आजारामुळे संपविले जीवन

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

भादलवाडी येथील १९ वर्षाच्या नवतरुणांने गळफास घेत जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी संध्याकाळी ८ सुमारास घडली. शांत आणि समंजस तरुणाच्या आतातायी निर्णयामुळे भादलवाडी गावावर शोककळा पसरल्याचे दिसून आले.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार अभिषेक रामकृष्ण एकाळे वय १९ असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात श्रीक्रुष्ण महादेव एकाळे यांनी खबर दिली असून भिगवण पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.रविवारी संध्याकाळी श्रीकृष्ण आपल्या कामावरून घरी आले असता त्यांना पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगल नायलॉन दोरीच्या आधारे अभिषेकने गळफास घेतल्याचे दिसून आले.यावेळी तातडीने आरडाओरडा करीत नातेवाईकांना बोलावून अभिषेकला खाली घेत उपचारासाठी भिगवण येथील खासगी आय.सी.यु दवाखान्यात आणण्यात आले.मात्र यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी इंदापूर जिल्हा रुग्णालयात पाठविले.

याबाबत भिगवण पोलीस पुढील तपास करत असून मृत्यू पूर्वी सुसाईड नोट मध्ये पोटाच्या आजारामुळे आपण आपला जीव देत असल्याची माहिती मिळत आहे.मात्र नवयुवकाने घेतलेल्या निर्णयामुळे नातेवाईकांना दुखाचा सामना करण्याची वेळ आली आहे.

भिगवण येथे जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ

0

नवीन उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत ;मात्र बाजारात सुविधांचा वानवा

भिगवण परिसरातील व्यवसायात होणार मोठी वाढ ; तरुणांच्या हाताला काम मिळण्यात होणार मोठा फायदा

भिगवण वार्ताहर .दि.२९

कृषी उत्पन्न इंदापूर बाजार समितीच्या उप बाजार भिगवण येथे रविवारी पासून जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या बाजारात परिसरातील अनेक शेतकरी आणि व्यापारी यांनी सहभाग नोंदवीत आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याची माहिती सभापती दत्तात्रय फडतरे यांनी दिली.

बाजार समितीने भिगवण येथे सुरु केलेल्या जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.३ जिल्हे आणि ५ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या भिगवण येथे दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर आहेत.तर पुणे सोलापूर महामार्ग भिगवण गावाला छेदून जात असल्यामुळे याचा फायदा प्रत्यक्षात गावाला होत असल्याचे दिसून येते.इंदापूर बाजार समितीचे उप बाजार भिगवण येथे आहे.तसेच या समितीची पुणे सोलापूर महामार्ग तसेच बारामती राशीन राज्य मार्गा शेजारी मोठी जागा आहे.माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या आजच्या बाजाराला भिगवण परिसरातील शेतकरी तसेच राशीन ,कर्जत, बारामती ,फलटण ,इंदापूर ,पळसदेव ,कुरकुंभ ,पाटस,दौंड तसेच अनेक ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी भेट देत जनावराचे व्यवहार केले.

आजच नव्याने सुरु करण्यात आलेल्या बाजारात सुविधांचा वानवा जाणवत असला तरी त्या तातडीने उभारण्यात येणार असल्याचे सभापती फडतरे यांनी सांगितले.यावेळी बाजार समितीचे सदस्य आबासाहेब देवकाते ,माजी उपसभापती पराग जाधव ,काका वाबळे भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,विष्णुपंत देवकाते ,राजेंद्र देवकाते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.यावेळी बाजार समितीच्या वतीने शेतकरी आणि व्यापारी यांचा सन्मान करण्यात आला.समिती सचिव वैभव दोशी  यांनी आभार व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यानचा सन्मान ; भाजपा युवा मोर्चा चे उल्लेखनीय कार्य

0

वैद्यकीय ,शिक्षण ,वीज वितरण ,ग्रामपंचायत कामगार ,पाणीपुरवठा ,स्वच्छता कामगार ,आशा सेविका तसेच पोलीस पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकातेपाटील यांनी दिली…

भिगवण वार्ताहर .दि.२८

राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने कोरोनाच्या काळात रुग्ण सेवा देत योध्याची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्य सेवक ग्रामपंचायत तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.मदनवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला.

भाजपा युवा मोर्चा आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील मित्र मंडळीच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची बाजी लावीत अनेकांनी रुग्ण सेवा बजावली आहे.प्रत्यक्षात रुग्णांची सेवा करण्या बरोबरच जन जागृती स्वच्छता ,ग्रामपंचायत पाणीपुरवठा,आशा सेविका ,पोलीस पाटील आणि लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग असणाऱ्या सर्व कर्मचारी सेवक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कांचन कुल ,जि.प सदस्या अंकिता पाटील ,पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,इंदापूर बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव ,भाजपा युवा मोर्चाचे तेजस देवकातेपाटील ,गजानन वाकसे ,महेंद्र रेडके ,गटनेते संपत बंडगर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन तेजस देवकाते यांनी तर आभार मानण्याचे काम महादेव बंडगर यांनी केले.

पत्नीच्या प्रियकरानेच चिरला पतीचा गळा ; २४ तासाच्या आत भिगवण पोलिसांनी आवळल्या घातकी मजनुच्या मुसक्या

0

भिगवण च्या नवनिर्वाचित सिंघम अधिकारी दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक


भादलवाडी(ता.इंदापुर) येथे धारदार शस्त्राने गळा चिरून झालेल्या युवकांचा खुन हा विवाहबाह्य प्रेमसंबधातुन झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असुन पोलिसांनी चोवीस तासातच या खुनाचा तपास केला आहे. भिगवण पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असुन आरोपींना खुनाची कबुली दिली असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. भिगवण पोलिसांनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास चोवीस तासातच लावल्याबद्दल भिगवण पोलिसांचे कौतुक होत आहे.

भिगवण पोलीस ठाणे हद्दीत महेश दत्तात्रय चव्हाण(वय. ३४ रा. रावणगांव,ता.दौंड) या युवकाचा भादलवाडी(ता.इंदापुर) येथे मंगळवारी(ता.२४) धारदार कोयत्याने गळा कापुन अत्यंत निर्घृणपणे खुन करण्यात आला होता. या प्रकरणी मयत महेश चव्हाण यांचा बंधु नितीन चव्हाण यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी वेगवान हालचाली करत खुनाच्या तपासासाठी पथके रवाना केली होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत महेश चव्हाण याचे पत्नीचे अकोले(ता.इंदापुर) येथील युवकाशी लग्नाआधी प्रेमसंबध असल्याची बाब तपासात समोर आली होती. पोलिसांनी अकोले येथे छापा टाकुन अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे(वय.२१ रा. अकोले,ता.इंदापुर) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अनिकेत शिंदे यांने प्रेमसबंधामध्ये अडथळा आणणाऱ्या महिलेच्या पतीचा खुन केला असल्याची कबुली दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अनिकेत शिंदे यांचे सदर महिलेसोबत प्रेमसंबध होते. पतीमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हते. अनिकेत याचा बंधु गणेश शिंदे याचा त्याच्या घटस्फोटास सदर महिलेचा पती कारणीभुत असल्याचा समज झाला होता. त्यामुळे गणेश शिंदे हाही महिलेच्या पतीवर चिडुन होता. अनिकेत शिंदे व महेश शिंदे यांनी नियोजन करुन महेश चव्हाण यास बोलावुन घेऊन भादलवाडी(ता.इंदापुर) येथील निरा-भिमा जोड कालव्याच्या बोगदयाच्या डंम्पिग यार्डजवळ नेऊन धारदार कोयत्याने गळा कापुन खुन केला. आरोपींनी खुनाची कबुली दिली असुन आरोपींना इंदापुर येथील न्यायालयांमध्ये हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
भिगवण पोलिसांनी भादलवाडी येथील खुनाचा चोवीस तासातच तपास केला. ही कामगिरी पोलिस ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष रुपनवर, विनायक दडस, पोलिस अंमलदार नाना वीर, केशव चौधऱ तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार अभिजित एकशींगे अनिल काळे रविराज कोकरे या पथकाने छडा लावला . अधिकचा तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा गळा चिरून खून ; भादलवाडी अकोले शिवे वर आढळून आला मृतदेह

0

भिगवण वार्ताहर.दि.२४

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील भादलवाडी येथे ३४ वर्षीय इसमाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करीत तपासासाठी पथकाची नेमणूक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महेश दत्तात्रय चव्हाण वय ३४ रा.रावणगाव इरीगेशन कॉलनी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.मयत महेश याची अकोले या ठिकाणी सासरवाडी असून रक्षाबंधना साठी तो पत्नीसह अकोले गावी आला होता.सोमवारी रात्री देवदर्शनाला जातो असे निघालेला महेश संध्याकाळी घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी अकोले भादलवाडी गावाच्या शिवेवर असणाऱ्या नीरा भीमा नदी जोड प्रकल्पाच्या डम्पिंग दगडामध्ये कामगारांना त्याचा मृतदेह आढळून आला.मयत महेशचा गळा धारदार शस्त्राने चिरून त्याचा खून करण्यात आल्याचे घटना स्थळी दिसून आले आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवर गुन्ह्याची नोंद करीत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे.

भिगवण पोलीस हद्दीत झालेल्या या खुनाच्या तपासासाठी बारामती विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देत माहिती घेतली.

मदनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंगाडे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड ; ग्रामीण भागांतील सर्व सामान्य कार्यकर्त्याला मिळाली संधी

0

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्ता मामा भरणे ,पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर ,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या माध्यमातून पक्षाची विचार धारा सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिक पणे करणार …..सतीश शिंगाडे सर चिटणीस राष्ट्रवादी पक्ष

भिगवण वार्ताहर .दि.१४

मदनवाडी गावाचे सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंगाडे यांची राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्ती पत्राद्वारे दिली.

शिंगाडे यांचा शिक्षण संस्था तसेच इतर सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांत सहभाग असतो.राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणाची ओळख ग्रामीण भागातील तळागाळातील नागरीकाना व्हावी यासाठी ग्रामीण भागातून त्यांची निवड करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. सरचिटणीसपदी निवड झाल्याचे पत्र राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर ,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,मदनवाडी वि.का.सोसायटी चेअरमन विष्णुपंत देवकाते ,सुरेश नरुटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.यावेळी बोलताना शिंगाडे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विचार धारा सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.

पंजाबची तरुणी झाली भिगवण करांची सून ; स्वर्गाने नाही सोशल मीडियाने बांधल्या गाठी

0

जात पात धर्म प्रांत भाषांचा अडथळा पार करीत तरुणी आली प्रियकराच्या घरात ……

या संपूर्ण प्रकरणात भिगवण पोलिसांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करीत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत मुलीच्या म्हणण्याप्रमाणे प्रियकराच्या बरोबर राहण्यासाठी प्रकिया पूर्ण केली

भिगवण वार्ताहर.दि.१४

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशे मानले जाते मात्र मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आणि तेही जातपात ,धर्म प्रांत आणि भाषा यांना फाटा देत पंजाब राज्यातील तरुणी महाराष्ट्र राज्यातील तरुणाच्या प्रेमात पडली.इतकच काय हजारो किलोमीटरचा प्रवास करीत प्रियकराच्या घरात पोहोचली.

अगदी सिनेमात घडावी अशी हि स्टोरी याबाबतची सविस्तर हकीकत अशी कि मोबाईल फायर गेम आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील भिगवण गावच्या १९ वर्षाच्या तरुणाची ओळख पंजाब राज्यात राहणाऱ्या तरुणीशी झाली.ओळखीतून एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होत त्याचे रुपांतर प्रेमात झाले.मग पुढ काय सुरु झालेल्या चॅटिंग मघ्ये या दोन प्रेमी युगुलाने एकत्र येण्याचे ठरविले .मग काय प्रेमिका पंजाब पासून निम्मे अंतर पार करून आली तर प्रेमी निम्मे अंतर पार करीत प्रेमिकेला आपल्या घरी घेवून आला.मग पुढ काय प्रेमिकेच्या घरच्यांनी शोध घेत पंजाब पासून भिगवणला धडक मारली.

भिगवण येथे आलेल्या पंजाबच्या नातेवाईक यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी प्रेमी युगुलाला त्यांच्या नातेवाईकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.यावेळी पोलीस ठाण्यातील वातावरण एकदम तंग झाल्याचे दिसून आले.मुलीच्या बाजूने आलेली माणसे धड धाकट असल्यामुळे आणि यातून काही वादाचा प्रसंग येवू नये म्हणून पोलिसांची खबरदारी घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसले.मुलीच्या वडिलाने अनेक प्रयत्न करूनही मुलगी आपल्या प्रियकरा सोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली.आता मुलगी २१ वर्षाची असल्यामुळे कायद्या नुसार तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.तर मुलगा १९ वर्षाचा असला तरी त्याने तिच्याशी लग्न केले नसल्यामुळे कोणतीच कारवाई पोलिसांना करणे शक्य नव्हते.मग काय भिगवण पोलीस या प्रेमी युगुलाच्या बाजूने उभे राहत मुलीच्या नातेवाईकांना समजूत घालीत न्यायालयाच्या आदेशानुसार परत पाठविण्यास यशस्वी झाले.त्यामुळे अखेर पंजाबची प्रेयसी आणि भिगवणचा प्रियकर न्याय देवतेचे आभार मानीत लिव्ह इन रिलेशन मध्ये घरी राहण्यासाठी गेले.

प्रचलित कायद्या नुसार २१ वर्षीय तरुणीला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे.तर १९ वर्षाच्या तरुणाने लग्न केल्यास तो गुन्हा ठरला असता मात्र ते लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत असल्यास कायदा आडवा येत नाही,त्यामुळे यात कारवाई करत भिगवण पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात हजर केले .न्यायालयाने मुलीची बाजू ऐकून घेत तिच्याच बाजूने निर्णय दिल्याने अखेर प्रेमच जिंकलं हे मात्र नक्की….

पुणे सोलापूर महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यास सुरवात ; कारवाई मध्ये फक्त चारच दुकानावर अन्याय का ?अतिक्रमण करणारांचा सवाल

0

पुणे सोलापूर महामार्गाच्या पूर्व पश्चिम बाजूला अतिक्रमण झालेले असताना कारवाई फक्त चार दुकानावर का ? कारवाई होत असलेल्या ठिकाणच्या नागरिकांचा सवाल

कारवाई करत असताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही .सदर ठिकाणच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला मिळाल्याने कारवाई होत असून हद्दीतील सर्व अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची हायवे प्रशासनाचे कायदेशीर वकील सरवदे यांची माहिती.

भिगवण वार्ताहर .दि.१२

पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर असणारे अतिक्रमण हटविण्याची कारवाईला आज सुरवात करण्यात आली.मात्र या कारवाईला अतिक्रमण करणार्यांनी विरोध करीत कारवाई सर्व ठिकाणी झाल्यास आम्ही स्वताहून आमची दुकाने काढू अशी मागणी केली.

पुणे सोलापूर महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे.तर अगदी मुख्य हायवे वर सुद्धा भाजी तसेच फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे.त्यामुळे अपघाताची शक्यता असून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हायवे प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या माध्यमातून या अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.हायवे प्रशासनाचे कायदेशीर सल्लागार अॅड .सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई सुरवात करण्यात आली असून या कारवाईला अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांनी विरोध केला .महामार्गाच्या दोनही बाजूला अतिक्रमण असताना फक्त आमच्याच दुकानावर बुलडोझर का अशी विचारणा यावेळी या दुकानादारणी केली.तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काही सवलत दिल्यास आम्ही आमची सोय करू असी विनंती करीत कोरोनामुळे आधीच अर्धमेला झालेल्या दुकानदाराला अजून मारू नका अशी आर्जव केली.त्यामुळे अतिक्रमण करणारे व्यावसायिक आणि कारवाई साठी आलेल्या अधिकारी यांना भिगवण पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.अतिक्रमण करणार्यांनी पोलीस अधिकारी जीवन माने यांना कारवाई काही दिवसासाठी पुढे ढकलण्याची विनंती करणारे पत्र दिले .मात्र हायवे प्रशासन कारवाई करण्यावर ठाम असल्यामुळे वातावरण तापले असल्याचे दिसून आले.

पुणे सोलापूर महामार्गावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अतिक्रमण करण्याची मानसिकता निर्माण होत असून नंतर करण्यात येत असलेल्या कारवाईला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.प्रशांत चवरे यांची निवड

0

प्रा .डॉ .प्रशांत चवरे यांचा राजकीय सामाजिक तसेच शेती विषयक बातमी क्षेत्रात दांडगा अभ्यास

मराठी पत्रकार संघ अध्यक्ष पदाची धुरा मिळाल्याने भिगवण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

भिगवण वार्ताहर.दि.८

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भिगवण कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.प्रशांत चवरे यांची निवड करण्यात आली. सामाजिक, राजकीय घडामोडी तसेच शेती विषयक बातम्यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या डॉ.चवरे यांच्या नियुक्ती बद्दल भिगवण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

भिगवण मराठी पत्रकार संघ २०१९ साली अधिकृत नोंदणी करण्यात आलेला संघ आहे.जवळपास २५ च्या वर सदस्य संख्या असणाऱ्या संचाचा नोंदणी क्र.महा.१७४९ /२०१९ असून सामाजिक सेवेत वेगळी ओळख आहे.वृतपत्र विक्रेत्यांच्या अडचणी तसेच त्यांना मदत मिळावी यासाठी संघाच्या वतीने काम करण्यात येते . लोकमत पत्रकार सुरेश पिसाळ यांच्याकडे सघ स्थापनेपासून अध्यक्ष पदाची धुरा होती.संघाच्या ध्येय धोरणानुसार इतर सन्माननीय सदस्यांना संधी मिळावी या हेतूने पिसाळ यांनी राजीनामा देत अध्यक्ष पदासाठी डॉ.चवरे यांच्या नावाची घोषणा केली.याला संघातील सदस्यांनी संमती दिल्याने अध्यक्ष पदाची धुरा डॉ.चवरे यांच्याकडे आली आहे.डॉ.चवरे हे भिगवण येथील कला महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांनी पीएचडी करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली आहे.सकाळ दैनिकाचे १५ वर्षापासून पत्रकारिता करणारे चवरे यांचा बातमी क्षेत्रात अतिशय दांडगा अभ्यास असून परिसरात त्यांची मोठी ओळख आहे.त्यांच्या निवडी बद्दल समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी , सामाजिक संघटना व्यापार संघटना यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
निवडीवेळी बोलताना डॉ.प्रशांत चवरे यांनी आपण अध्यक्षपद भूषवित असताना सामाजिक सेवा तसेच आपल्या पत्रकार संघाला इमारत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.