Saturday, May 23, 2026
Home Blog Page 11

भिगवणमध्ये दुकानचा पत्रा कापून किराणा मालाची चोरी ;

0

भिगवण वार्ताहर.दि.२४

किराणा मालाच्या दुकानाचा पाठीमागे असणारा पत्रा कापून ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भिगवण येथे घडली.तर पाठीमागे याच दुकानदाराला ५० हजार रुपयाचा चुना लावून भामट्याने किराणा नेला त्याचाच तपास लागला नसतानाच हि घरफोडी घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत अजिनाथ वसंत कवितके या किराणा व्यावसायिकाने भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.कवितके यांचे भिगवण येथे दुकान असून १९ तारखेला सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील माल लंपास झाल्याचे लक्षात आले.यावेळी त्यांनी दुकानाची पाहणी केली असता त्यांना पाठीमागील बाजूचा पत्रा कापून कोणीतरी आत येत माल लंपास केल्याचे लक्षात आले.त्यांनी तातडीने याची माहिती भिगवण पोलीस ठाण्यात देत अज्ञात आरोपी विरोधात घरफोडी तसेच चोरीची तक्रार दिली.यात जवळपास ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल गेल्याची तक्रार देण्यात आली आहे.

या चोरी झालेल्या दुकानात काही दिवसापूर्वी एका भामट्याने घरी लग्नाचा कार्यक्रम आहे असे सांगून ५० हजार रुपयाचा माल सोबत घेत पोबारा केला होता.या गुन्ह्याचा तपास भिगवण पोलीस करत असतानाच दुकानात परत चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यात दोन्ही वेळेला दुकानदाराचे नुकसान झाले असून आता पोलीस तपास कसा करतात याकडे भिगवण करांचे लक्ष लागून राहिले आहे.सदर चोरीचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार समीर करे करीत आहेत.

रस्त्याच्या विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी ; आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वातावरण अजून तापणार .

0

भिगवण वार्ताहर.दि. १९

भिगवण येथे १५ व्या वित्त आयोगातील मंजूर रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच हमरीतुमरी झाल्याची घटना घडली.तर यावेळी विरोधकांनी विकासकामे अडवून सदस्यांना शिवीगाळ केल्याची माहिती सत्ताधारी पार्टीच्या सदस्य प्रतिनिधी तुषार क्षीरसागर यांनी दिली .तर स्थानिक नागरिकाच्या मागणीनुसार रुंदी वाढविण्याची मागणी केली यात वादविवाद करण्याचे कारणच नसल्याचे राष्ट्रवादीचे सचिन बोगावत यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जात असलेल्या भिगवण मध्ये मागील काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी पुरस्कृत पार्टीचा पराजय करीत सत्तेत आलेल्या भाजपा पुरस्कृत पार्टी मागील काळात निधी मिळत नसल्यामुळे भिगवण गावातील विकास कामात सातत्य न राखता आल्याचे बोलले जाते.तर भिगवण गावच्या विकासासाठी राज्यमंत्री भरणे यांनी विकासनिधी देवूनही त्याचे श्रेय लाटले जात असल्याचे राष्ट्रवादीच्या बाजूने सांगितले जात आहे. भिगवण ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगात मंजूर झालेल्या ३ मीटर रुंद ९५ मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला रविवारी सुरवात करण्यात आली होती.मात्र यावेळी माजी सरपंच संतोष धवडे यांनी रस्त्याची रुंदी ४ मीटर करण्याची मागणी केली. तसेच स्थानिक नागरिकांची मागणी असताना ३ मीटर रुंदीचा रस्ता करण्यास विरोध दर्शविला .यावेळी सत्ताधारी सदस्य आणि विरोधक यांच्यात काही काळ बाचाबाची झाली. राष्ट्रवादीच्या सचिन बोगावत ,संतोष धवडे यांची तुषार क्षीरसागर यांच्या सोबत अगदी शिवीगाळ पासून अंगावर धावून जाण्यापर्यंत वादावादी झाली.यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.मात्र याविषयी भिगवण पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सरपंच तानाजी वायसे : भिगवण गावच्या नागरिकांनी विरोधकांना सत्तेतून घरी बसविले असल्यामुळे विकास कामात अडथळा आणण्याचे काम केले जात आहे.तर भिगवण शहरात होणारी विकासकामे नियमाचे पालन करून आणि अत्यंत पारदर्शकपणे केली जात आहेत.सदर रस्ता ३ मीटर रुंदीचा असून शिल्लक जागेतून पिण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले.

माजी सरपंच महेश शेंडगे : सत्ताधारी ग्रामपंचायत पदाधिकारी सत्तेचा दुरुपयोग करून अनियमित विकासकामे करीत आहेत.तर माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांनी विकास कामासाठी निधी देवूनही श्रेयवाद घेण्याचे चुकीचे काम केले जात आहे.तर आम्ही सत्तेत असताना सर्व रस्ते ४ मीटर केले असताना आता त्याठिकाणी ३ मीटरचा हट्ट कशासाठी धरला जात आहे याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच आहे.

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भिगवण मधील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वातावरण अजून तापणार असल्याचे दिसून येत आहे.माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या रोज चाललेल्या शाब्दिक युद्धामुळे याला अजून वारा मिळत आहे. मात्र भिगवण गावच्या इतिहासात राजकारणावरून तुफानी कधीच घडलेली नसल्यामुळे पुढेही भिगवण गावचे वातावरण स्वच्छ राहावे हि ग्रामस्थांची मागणी आहे.

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य तुषार क्षीरसागर यांची निवड ; तर सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे

0

भिगवण वार्ताहर.दि.१५

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर तर मराठी पत्रकार सोशल मिडिया सेल च्या अध्यक्षपदी सागर जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्योती व्हेज या सुप्रसिद्ध हॉटेल येथील हॉल मध्ये नवजीवन एजन्सीच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न भिगवण मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका ,दौंड तालुका तसेच करमाळा तालुका असे तीन तालुक्यातील ३५ च्या वरती सदस्य संख्या आहे.२०१९ साली सुरु करण्यात आलेल्या संघाच्या वतीने सामाजिक तसेच शैक्षणिक प्रकल्प राबविले जातात.मागील काही वर्षात कोरोनाच्या महामारीत पेपर वितरण करणाऱ्या कामगारांना शक्य ती मदत पुरविण्याचे काम या संघाच्या माध्यमातून करण्यात आले.तर शाळकरी विद्यार्थी यांची वक्तृत्व स्पर्धा तसेच सामाजिक सेवेत ज्यांनी आपला ठसा उमटविला त्यांचे नागरी सत्कार करण्यात आले. अध्यक्ष डॉ.प्रशांत चवरे यांनी पदाचे वर्ष पूर्ण होताच तरुणांना अध्यक्षपदी निवड करण्याचा मानस व्यक्त केला होता.हॉटेल सागर येथील पदाधिकारी बैठकीत याबाबत ठराव घेण्यात आल्याने अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर यांची तर सोशल मिडीया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे याची नियुक्ती करण्यात आली.

नवजीवन पेपर एजन्सीच्या वार्षिक सभासद लकी कुपन बक्षीस वितरण समारंभावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे ,सकाळ पेपरचे बारामती वितरण विभाग प्रमुख मनोज काकडे प्रा.शाम सातरले ,संजय खाडे ,संजय चौधरी ,केशव भापकर ,चंद्रकात रायसोनी ,शहाजी कदम ,उपस्थित होते.

विहिरीच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडे ; पोंधवडी गावातील प्रकार

0

भिगवण वार्ताहर.दि.१३

पोंधवडी ग्रामपंचायत माध्यमातून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घराला तडे जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.तर गावाला लागुनच होत असलेल्या विहिरीवर कोणतीही सुरक्षित उपाय योजना केल्या जात नसल्याचे बोलले जात आहे.

पोंधवडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा जलजीवन मिशन अंतर्गत पोंधवडी गावात या विहिरीचे काम सुरु करण्यात आलेले आहे.हि विहीर गावाच्या अगदी काही फुटांवर खोदली जात असून कंत्राटदार यांच्याकडून कोणतीही सुरक्षितता पाळली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या विहिरीत स्पोटके उडवली जात असून याच्या हादर्याने घरांना तडे जावू लागले आहेत.याबाबत गावातील नागरिक संजय पवार यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली आहे.गटविकास अधिकारी विजय परीट यांनी अभियंत्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत.तर ब्लास्टिंग करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे दिसून येते.

याबाबत गटविकास अधिकारी विजय परीट यांनी याविषयी ग्रामपंचायत विभागाला सूचना केल्या असून पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले.तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रथम विचार करून योग्य ते निकष पाळले बाबत सूचना केल्याचे सांगितले.

पुणे सोलापूर महामार्गावर स्वच्छता करणाऱ्या महिलेचा अपघात ;उपचार खर्च देण्यास हायवे प्रशासन तसेच कंत्राटदार यांची टाळाटाळ

0

भिगवण वार्ताहर.दि.१०

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परिसरात सकुंडेवस्ती येथे मेंटेनन्सच्या कंत्राटी कामात असणाऱ्या महिलेचा अज्ञात दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेची जबाबदारी हायवे प्रशासन आणि सबंधित कंत्राटदार घेताना दिसून येत नसल्यामुळे दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल कुटुंबापुढे निर्माण झालेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि पुणे सोलापूर महामार्गावर रोडची स्वच्छता तसेच डिव्हायडरवर लावलेल्या झाडांची निगा ठेवण्याचे काम हायवे आणि टोल प्रशासन कंत्राटी पद्धतीने देत असतात.याच कामावर असणाऱ्या एका महिलेचा सकुंडेवस्ती येथे ४ दिवसापूर्वी अज्ञात दुचाकीस्वार धडकून अपघात झाला.या अपघातात महिलेच्या पायाचे हाड २ ठिकाणी मोडले.तर छातीच्या ४ बरगड्या मोडल्या.अपघात घडताच या महिलेला बारामती येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या महिलेचा उपचार सुरु असून दवाखान्याचे बिल २ लाख च्या पुढे असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. रोज काम करून खाणारे कुटुंब असून त्यांच्याकडे इतकी रक्कम जमविणे शक्य नाही.मात्र रस्त्यावर काम करत असताना अपघात झाला असल्यामुळे याची जबाबदारी हायवे आणि टोल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.तसेच यात ज्यांनी कंत्राट घेतले आहे त्यांनी कामावरील माणसाच्या जीविताची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे बिला अभावी महिला मृत्युच्या दारात सोडणे योग्य नाही.

याबाबत मेंटेनन्स विभागाच्या सुरजित सिंग यांच्याशी संपर्क साधला असता यात नक्की खर्च कोणी करायचा आणि कामावरील लोकांच्या जीविताची जबाबदारी कोणाची याचीच माहिती त्यांना नव्हती त्यामुळे त्यांनी काही न बोलता फोन स्वीच ऑफ केला.

याबाबत सबंधित कंत्राटदार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे  कंत्राट घेताना कामगाराच्या जीवितेची जबाबदारी कोणाची आणि त्यांचा आयुर्विमा कोण उतरवणार याची माहिती अनुत्तरीत राहिली.

चौकट : पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक सुरु असताना अनेक कामगार काम करीत असतात .त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी हायवे प्रशासन घेत नसल्याचे दिसून येते.तर अपघात झाल्यावर त्यांना असे वाऱ्यावर सोडून दिले जाते.मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी गोरगरीब महिला पुरुषांना काम मिळत नसल्यामुळे याकडे ते दुर्लक्ष करून कामावर येतात आणि यात त्यांना नाडले जाते.

भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आदर्शवत मिरवणूक ;टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप

0

भिगवण वार्ताहर.दि.९

भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या नादात भजने गावून गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. डीजे गुलाल आणि बीभत्स अंगविक्षेप नृत्याला फाटा देत अनेक गणेश मंडळासमोर हा आदर्श ठेवल्याचे या मिरवणुकीतून दिसून आले.

भिगवण ग्रामपंचायत दरवर्षी गणपती विराजमान करीत असतात.मागील दोन वर्ष मात्र हा आनंद उत्सव शासनाच्या निर्बंधांमुळे होवू शकला नाही.मात्र कोरोना आटोक्यात येताच शासनाच्या वतीने निर्बंधमुक्त उत्सवाला परवानगी मिळाल्यामुळे सत्तेत आलेल्या कार्यकारिणीने मोठ्या उत्साहात गणेश विराजमान केले. आजच्या विसर्जनाच्या दिवशी सर्व सदस्यांनी तसेच पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी वारकरी पोशाख घालत हाती टाळ मृदुंगाच्या समवेत मिरवणुकीत सहभाग घेतला.यावेळी सरपंच तानाजी वायसे ,बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव ,इंदापूर समितीचे माजी उपसभापती संजयभाऊ देहाडे यांनी सर्व सदस्यांना सोबत घेत गणपती बाप्पांना निरोप दिला. यावेळी सर्व सदस्यांनी हाती टाळ घेत ‘ज्ञानबा तुकाराम ’ ‘ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ’ अशी भजने गात मिरवणुकीत सहभाग नोंदवला.भिगवण ग्रामपंचायत यांनी प्लास्टिक मुक्त भिगवण तसेच हरितक्रांती करणारे भिगवण असे आदर्श ग्रामस्थांसमोर ठेवले असतानाच आज विसर्जन मिरवणुकीत भजने गात गणपती बाप्पाला दिलेला निरोप तरुण मंडळी समोर आदर्श ठरला आहे.

भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा सहभाग

0

भिगवण वार्ताहर.दि.९

भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात बाप्पाला निरोप दिला.

भिगवण पोलीस ठाण्यात प्रत्येक वर्षी गणपती विराजमान केले जातात.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या जागतिक महामारी मुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नाही.मात्र सरकारने या वर्षी सर्व निर्बंध हटविल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाचा मुख्य भाग असल्यामुळे भिगवण पोलिसांनी मोठ्या उत्साहात गणपती विराजमान केले होते.आज १० व्या दिवशी सर्व पोलीस अधिकारी यांनी कुडता पायजमा सारखा पारंपारिक वेशभूषा करीत आणि महिला पोलिसांनी फेटे बांधून विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.यावेळी बारामती विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट देत मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला .प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार ,पीएसआय विनायक दडसपाटील,रुपेश कदम ,सुभाष रूपनवर ,अंतूल पठाण ,महेश उगले ,नाना वीर ,रामदास जाधव यांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन करीत गणपती बाप्पाला निरोप दिला.यावेळी बेन्झो च्या तालावर थिरकत पोलीस बांधवांनी आनद लुटला.

भिगवण पोलीस ठाण्यापासून सुरु झालेली विसर्जन मिरवणुक हायस्कूल रस्त्याने जाणता राजा चौक ,शिवाजी महाराज चौक ,कला महाविद्यालय ,तसेच दुर्गामाता मंदिराच्या समोरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे तक्रारवाडी चौकातून राशीन रस्ता अशा मार्गाने काढण्यात आली.

कुंभारगावमध्ये बनावट शिक्के वापरून दाखले ;टोळी कार्यरत असण्याचा सरपंच उज्ज्वला परदेशी यांचा संशय

0

भिगवण वार्ताहर .दि.७
कुंभारगांव(ता.इंदापुर) येथील ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा बनावट शिक्का बनवुन त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामसेवकांच्या सजगतेमुळे उघड झाला आहे. याबाबत कुंभारगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये सही व शिक्याचा गैरवापर झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
याबाबत कुंभारगावचे ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मिळालेली माहिती अशी की, संजय शिवाजी मोरे यांचा कुंभारगांव ग्रामपंचायतीकडे आर.सी.सी. बांधकाम नोंद करण्यासाठी अर्ज आला होता. कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये सदर अर्ज मंजुरही करण्यात आला होता. श्री. मोरे यांनी बारामती येथील शुभंम फायनान्स कंपनी यांचेकडे मिळकत क्र. ८२ चा दि. २२ जुन या तारखेचा उतारा सादर केला होता. फाय़नान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला उताऱ्याबाबत शंका आल्यामुळे सादर केलेला उतारा त्यांनी ग्रामसेवक श्री. बोरावके यांचे व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठविला. उतारा पाहिल्यानंतर उताऱ्यावरील सही व शिक्के बनावट असल्याचे ग्रामसेवक बोरावके यांचे लक्षात आले. याबाबत श्री. बोरावके यांनी येथील भिगवण पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के व सहया करण्यात आल्याची तक्रार केली असुन याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


सरपंच उज्वला परदेशी : ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के तयार करणे व बनावट सह्या करणे हे प्रकरण गंभीर आहे. यामधुन बॅंका, पतसंस्था यासारख्या आर्थिक संस्थाची फसवणुक झाली असण्याची शक्यता आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलुन कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.तसेच याबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे सांगितले .

पोलिस पाटील यांच्याविरोधात ठराव घेणं पडल महागात ; तत्कालीन सरपंचासह तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

0

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावातील प्रकार ; सरपंच पदाचा गैरवापर करत घेतला होता ग्रामसभेत ठराव .

भिगवण वार्ताहर.दि.२७

भादलवाडी गावच्या महिला पोलीस पाटील तनुजा कुताळ यांच्या विरोधात गर्दी जमवून त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर आणि इतर दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे पदाचा गैरवापर करीत गावातील वातावरण दुषित होवून महिला पोलीस पाटील यांची प्रतिमा मलीन करणार्याना चांगलाच धडा मिळाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि २१/०८/२०१८ रोजी भादलवाडी गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तत्कालीन सरपंच राणी भगवान कन्हेरकर यांनी तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या काहीनी पोलीस पाटील कुताळ यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत त्यांच्या पद्द रद्द करावे असा बेकायदेशीर ठराव घेतला होता. तसेच १४ /०९/२०१८ विभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करीत पद्द रद्द करण्याची मागणी केली होती.मात्र विभागीय कार्यालयाकडून हा अर्ज फेटाळण्यात आला होता.यातून आपली प्रतिमा मलीन झाल्यामुळे पोलीस पाटील कुताळ यांनी इंदापूर न्यायालयात धाव घेत बाजू मांडली होती.त्याच अनुष्ण्घाने न्यायलयाने तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर ,योगेश कदम ,काकासाहेब कन्हेरकर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर यांनी या आदेशाविरोधात बारामती न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करीत यातून आपले नाव वगळण्याची मागणी केली होती.मात्र त्यातही त्यांना  दिलासा न मिळत त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.

याबाबत पोलीस पाटील तनुजा कुताळ यांनी सबंधित व्यक्तींनी आमची मोठ्या प्रमाणावर बदनामी केली होती.पदाचा गैरवापर करीत ठराव घेतले होते.पण आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे अखेर सत्याचा विजय झाला असल्याचे सांगितले.न्यायालयात कुताळ यांची बाजू प्रसिद्ध वकील सचिन वाघ यांनी बाजू मांडीत न्याय मिळवून दिला.

मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा

0

भिगवण वार्ताहर.दि.२३

मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.

उजनी धरणाच्या शेजारी असणारे मदनवाडी गाव हे टेकडीच्या शेजारी आणि वाड्या वस्त्यात विखुरलेले गाव आहे.बहुतांश नागरिक शेतकरी असल्यामुळे प्रत्येक जन आपल्या सोयीनुसार शेतात आणि वस्त्यात विखुरलेला पहावयास मिळतो.त्यामुळे पावसाच्या दिवसात चिखलात राहावे लागत असताना उन्हाळ्याच्या दिवसात मात्र महिलांना डोक्यावर हंडा घेवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत होती.तत्कालीन सरपंच दिवंगत अंकुशराव बंडगर यांनी २००७ साली सत्तेत असताना महिलाच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले.यात काही अंशी ते यशस्वी ठरले.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ हर घर नल’ ‘ हर नल जल ‘या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून सरपंच आम्रपाली बंडगर तसेच जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर यांच्या पाठपुराव्यातून राज्यमंत्री दतात्रय भरणे यांनी मदनवाडी गावच्या विकासासाठी भरीव मदत करीत १५ कोटी रुपये किमतीची जलजीवन मिशन योजना मंजूर करून ठेवली आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार व केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनच्या मार्गदर्शन तत्वानुसार पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती साठी योजनेच्या किमतीच्या १० टक्के रक्कम लोकवर्गणीच्या देणे आवश्यक राहणार आहे.तसेच सदर योजनेतून प्रत्येक घरात नळ जोडणी देणे आवश्यक असल्याच्या अटींवर हि मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत मदनवाडी गावचे आदर्श सरपंच तुकाराम बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २००९ सालापासून गुंठेवारी नोंदी शासनाने बंद केलेल्या असल्यामुळे मदनवाडी गाव हे ७५ टक्के इतर हक्कात येणाऱ्या उताऱ्यात वसले असल्याचे सांगितले.त्यामुळे याठिकाणी राहणाराची नोंद ग्रामपंचायत प्रशासनाला घेता येत नसल्याचे वास्तव सांगितले.त्यामुळे नोंदीचे प्रमाण अल्प असून यातून मिळणारा कर हा ग्रामपंचायत प्रशासन चालविण्यासाठी अपुरा पडत असल्याचे सांगितले.त्यामुळे शासनाने या गुंठेवारीतील नोंदी संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.नाहीतर अशा १५ कोटीच्या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी मृगजळ ठरू नयेत हीच अपेक्षा असे व्यक्त केले.