Friday, May 22, 2026
Home Blog Page 5

मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीस दलात सेवा बजावीत असणाऱ्या पोलीस जवानाचा रेल्वे अपघातात मृत्यू ; विक्रोळी कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान घडला अपघात

0

भिगवण वार्ताहर.दि.११

मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुबई पोलीस दलात नोकरी करणाऱ्या पोलिसाचा विक्रोळी कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान अपघातात मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.होमगार्डची सेवा बजावीत असताना पोलीस  भरती होवून मुंबई येथे सेवा बजाविणाऱ्या तरुण पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार रवींद्र बाळासाहेब हाके वय २८ पोलीस कॉन्ष्टेबल बक्कल नंबर ३१९ नेमणूक एलए १ मुंबई शहर रा .मदनवाडी ता.इंदापूर यांचे रेल्वे अपघातात निधन झालेले आहे. सेवा बजावीत असतानाच पोलीस जवान रवींद्र यांचा हा मृत्यू झाला आहे.३ वर्षापूर्वी होमगार्ड ची सेवा बजावीत असताना रवींद्र हा पोलीस भरती झाला आणि मुंबई येथे तो सेवा बजावीत होता.तर रवींद्रचा छोटा भाऊ तुषार हा हि वर्षभरापूर्वी पोलीस भरती झाला असून तो जालना येथे ट्रेनिंग पूर्ण करीत आहे.साधारणपणे वर्षभरापूर्वीच रवींद्रचे लग्न होवून आठवड्यापूवी त्याला मुलगा झाला होता.त्याचा आनंद व्यक्त करून बुधवारी परत पोलीस सेवेत हजर झाला होता.अतिशय प्रामाणिक आणि पोलीस सेवेला वाहून घेणाऱ्या रवींद्रचा अपघाती मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.  

भिगवण ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिझर शस्त्रक्रिया :बाळंतपनाच्या खर्चातून सर्वासामान्य रुग्णाची फरफट थांबणार. इतर रुग्णांनाही चांगले उपचार मिळणार असल्याने नागरिकांनी लाभ घेण्याचे वैदकीय अधीक्षक यांचे आवाहन

0

भिगवण वार्ताहर .दि.८

भिगवण गावच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच महिला प्रसूती शस्त्रक्रिया म्हणजेच सीझर करण्यात यश आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी दिली.सीझर नंतर बाळ आणि महिला दोघांची प्रकृती ठणठणीत असून सीझर शस्त्रक्रिया वेळी खासगी दवाखान्यातील कट प्रक्टिस मुळे होणारी सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लुट थांबण्यास मदत होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि महिला सुलभ प्रसूतीसाठी तसेच सीझर प्रसूतीसाठी पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी शिवतेज ग्रुप आणि आखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने जन आंदोलन करीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.याच आंदोलनाची दखल घेत जिल्हा आरोग्य अधीक्षक डॉ.नागनाथ एमपले यांनी रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात अश्या सूचना कर्मचारी आणि अधिकारी यांना केल्या होत्या.याची दखल घेत येथील वैदकीय अधीक्षक डॉ.सचिन विभूते यांनी रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील अशी कार्यपद्धती अवलंबित कामकाज सुरु केले. बुधवारी प्रसूती साठी दाखल झालेल्या महिलेची नैसर्गिकरीत्या प्रसूती होणार नसून सीझर करावे लागेल याची खात्री झाल्याने तातडीने इंदापूरचे वैदकीय अधीक्षक डॉ.सिद्धार्थ नामपल्ले ,स्त्रीरोगतज्ञ डॉ.सूर्या दिवेकर ,भूलतज्ञ डॉ.युवराज हाके बालरोगतज्ञ डॉ.विनायक देशपांडे ,भिगवण परिसरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.अमोल खानावरे यांना पाचारण करीत सीझर शस्त्रक्रिया पार पाडली.शस्त्रक्रिया पार पडताच बालरोगतज्ञ डॉ.देशपांडे यांनी बाळाची तपासणी करून वैदकीय प्रक्रिया पूर्ण केली.सीझर नंतर बाळ आणि आई यांची प्रकृती ठीक असल्याने टीमने आनंद व्यक्त केला. या सीझर साठी राष्ट्रवादी कांग्रेस च्या तालुका उपाध्यक्षा सीमा काळंगे यांनी मोलाची मदत केली.तसेच दिवसभर या ठिकाणी थांबून बाळाची आणि त्याच्या आईच्या तब्बेतीची काळजी घेतली.

यावेळी बोलताना ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सचिन विभूते यांनी सीझर साठी उपलब्ध झालेल्या सर्व डॉ.टीमचे तसेच वैदकीय कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले .तसेच परिसरातील नागरिकांना आणि विशेषता महिला रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात बाळंतपण तसेच सीझर शस्त्रक्रिया पार पडत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

शिव फाउंडेशनने फुलविले जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू ; भिगवण स्टेशनच्या 200 विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल आणि खाऊ वाटप

0

भिगवण वार्ताहर. दि. 29

आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी जिल्हा परिषद पुणे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भिगवन स्टेशन येथे विद्यार्थ्यांना सुमारे 200 वॉटर बॅग व खाऊचे वाटप करून लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.

शिव फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.याच अनुषंगाने भिगवन स्टेशन येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल आवश्यकता आहे याची जाणीव फाउंडेशन च्या काही सदस्यांच्या लक्षात आली. याबाबत फाउंडेशन चे संस्थापक संपत बंडगर यांच्याकडे माहिती देण्यात आली लागलीच सदस्यांची मागणी आणि विद्यार्थ्यांची गरज याला तातडीने प्राधान्य देत 200 बॉटल खरेदी करण्यात आल्या. मात्र फक्त बॉटल देण्या ऐवजी त्याच सोबत खाऊ दिला तर आणखीन लहानग्याना आप्रूप वाटेल म्हणून बॉटल सोबत खाऊ चे वितरण यावेळी करण्यात आल्याची माहिती शिव फॉउंडेशन चे अध्यक्ष संपतरावं बंडगर यांनी बोलताना दिली ,तर गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात देखील शिव फॉउंडेशन च्या माध्यमातून इतर आवश्यक गोष्टी देऊ असे आश्वासन देखील यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी भिगवण ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खाडे,दिनेश मारणे,किरण रायसोनी,अरविंद देवकाते, संतोष आब्बड,आकाश वनवे, निलेश गायकवाड तसेच दीपक गुणवरे- अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शाळा भिगवण स्टेशन, महेंद्र मदने, पुनम शेळके, हसीना बारसकर, कोमल मराळे – सदस्य शाळा व्यवस्थापन समिती भिगवन स्टेशन प्रास्ताविक -मुख्याध्यापक भारत गायकवाड उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वनवे तर आभार राहुल लंबाते यांनी मानले.

ग्रामीण रुग्णालयातील सेवा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरु करण्यासाठी जनसामान्य नागरिकांचे आंदोलन : शिवतेज ग्रुप आणि मराठा महासंघाच्या मोर्चात 15 ग्रामपंचायत आणि संघटना सहभागी.

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

भिगवण ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने चालू करण्याच्या मागणीसाठी आज शिवतेज ग्रुप आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी शेकडो महिला तसेच नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा काढला होता.जनसामान्य रुग्ण आणि परिसरातील नागरिकांच्या या आवश्यक असणाऱ्या मागण्या १३ ओगस्ट पर्यंत मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याची माहिती शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजीत जाधव आणि अॅड.पांडुरंग जगताप यांनी बोलताना दिली.

भिगवण हे आसपासच्या ४० गावे आणि ५० च्या वरती असणाऱ्या वाड्यावस्त्या वरील नागरिकांसाठी उत्तम दळणवळण उपलब्ध होवू शकणारे गाव आहे.मात्र या गावात आरोग्याची सेवा देणारी यंत्रणा सक्षम नसल्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्याकडे जाने भाग पडत आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे भिगवण येथे ग्रामीण रुग्णालय तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला गोल्डन पिरेड मध्ये उपचार मिळावे आणि त्याचा जीव वाचावा यासाठी ट्रामा केअर सेंटर या दोन भव्य आणि मोठ्या निधीचा वापर करून इमारती उभारल्या आहेत .मात्र या इमारती फक्त नावालाच उभ्या राहिल्या आणि सर्वसामान्य नागरिकांना सेवेचा फायदा मात्र त्या पटीत झाला नाही.याच गैरसोयीचा विचार करून भिगवण येथील शिवतेज ग्रुपच्या रणजीत जाधव यांनी याविषयी आंदोलनाचा पवित्रा घेतला.शिवतेज ग्रुपच्या या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघ ,अमर बौद्ध युवक संघटना ,कुंची कोरवी समाज संघटना ,भारतीय जैन मारवाडी संघ तसेच परिसरातील १५ ग्रामपंचायत कार्यकारिणीने पाठींबा देत जन सामन्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती लावून आरोग्य सेवा सुधारावी अशी मागणी केली. यावेळी भिगवण गावच्या सरपंच दीपिका क्षीरसागर ,तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष विक्रम शेलार , मराठा महासंघाचे पांडुरंग जगताप ,माजी पंचायत समिती सभापती संजय देहाडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला जाधव,भिगवण मेडिकल असोसिएशनचे डॉ.संकेत मोरे ,जेष्ठ समाजसेवक अशोक शिंदे ,रणजीत जाधव ,शरद चितारे ,भूषण काळे यांनी आपल्या भाषणात अपुऱ्या सुविधा बाबत आपले म्हणणे मांडले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागनाथ एम्पल्ले आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य होणार असल्याचे सांगितले.तर ट्रामा केअर सेंटर लवकरच पूर्ण सुविधांसह सुरु व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

यावेळी आंदोलकांनी रिक्त असणाऱ्या डॉक्टर तसेच सेवक पदांची भरती ,एक्सरे मशीन तसेच सोनोग्राफी मशीन ,तसेच रुग्णवाहिका  दुरुस्तीसह चालकाची नेमणूक तातडीने करावी अशी मागणी केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी चोख बंदोबस्त राखला होता.

पुणे सोलापूर महामार्गांवर कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 1 गंभीर जखमी ; अति वेग आणि पावसाची रिप रिप मुळे अपघात घडल्याची शक्यता.

0

भिगवण वार्ताहर. दि. 1

भिगवण पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 3 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळतअसून हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी गाडीने तीन चार पलट्या मारल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.

रफिक कुरेशी (वय 34), इरफान पटेल (वय 24), मेहबूब कुरेशी (वय- 24) फिरोज कुरेशी (वय 28) फिरोज कुरेशी (वय 27) (सर्व रा. नारायनखेड, ता, जि-मेडक, तेलंगणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल अमीर (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नारायनखेड(जिल्हा-मेडक) या गावातील 6 तरुण मुंबईला फिरायला बलेनो गाडी मधून फिरायला गेले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर परत आपल्या नारायणखेड या गावी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत निघाले होते. पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत चालले असताना दुपारी चालू आलेल्या जोरदार पाऊसामुळे डाळज नंबर तीन च्या हद्दीतील सुजाता पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळली.
कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडीने तब्बल तीन चार पलट्या मारल्या. व यामध्ये गाडीत असलेले पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे संचालक केतन वाघ यांनी सर्व जखमींना भिगवण या ठिकाणी पुढील उपचारासाठी भिगवण आयसीयु या दवाखान्यात आणण्यात आले परंतु त्यातील पाच तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती पुढील उपचार चालू करण्यात आले.

पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू. बिल्ट पेपर कंपनी समोर अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने अपघात घडल्याची शक्यता

0

भिगवन वार्ताहर .दि. २६
पुणे सोलापूर महामार्गावर बिलट पेपर कंपनी समोरील बाजूला अकोले पाठीजवळ दुचाकीचा अपघात होऊन यात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ वा. सुमारास घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात अजय सौदागर आणि शिवानंद डुंगरे यांचा मृत्यू झाला. दोन्ही मयत तरुण लातूर येथील रहिवासी असण्याची माहिती मिळत आहे हे तरुण आपल्या ताब्यातील स्कुटी वरून पुणे येथून लातूरकडे जात असताना हा अपघात घडला.यात अज्ञात वाहनाने ठोकर दिले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अपघात घडल्याची माहिती मिळताच आपुलकीची जागा ॲम्बुलन्स संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी तरुणांना भिगवण येथील भिगवन मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार साठी दाखल केले मात्र उपचारा अगोदरच दोन्ही तरुण मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अधिकारी महेश कुरेवाड यांनी अपघात स्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली तसेच मृत तरुणांची ओळख त्यांच्याजवळ असणाऱ्या कागदपत्र आणि मोबाईलच्या सहाय्याने पटवून याची माहिती पोलीस ठाण्यात दिली.

हरवलेली पाखरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र ! यवतच्या विद्या विकास मंदिरातील विद्यार्थ्यां चे आगळ वेगळं स्नेह संमेलन

0

भिगवन प्रतिनिधी गणेश जराड

दि.२०/०५/२०२४

हरवलेली पाखरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र..

विद्या विकास मंदिर शाळेच्या २००३-२००४ या बॅचचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे.

विद्या विकास मंदिर यवत ता. दौंड‌ जि. पुणे या विद्यालयाच्या २००३-२००४ या इयत्ता बारावीच्या बॅचचे वार्षिक स्नेहसंमेलनचा सोहळा रविवार दि.१९ मे २०२४ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य असे होते की तब्बल वीस वर्षांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मुले- मुली एकत्र आले होते.
तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्नेहसंमेलनाचे नियोजन ठरले होते या स्नेहसंमेलनाला यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे सर्व मुले आणि मुली अहोरात्र प्रयत्न करत १९ मे २०२४ ही तारीख ठरली मेहेर रिसॉर्ट यवत या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला २७ मुले व २७ मुलींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.
तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींच्या आनंदाला उधाण आले होते.
सकाळी साडेनऊ वाजता‌ सर्व मुले मुली रिसॉर्टला उपस्थित झाले‌ सकाळी चहा नाष्टा या गोष्टी झाल्यावरती दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व मुलांची मुलींची मनोगते अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे व्यक्त केली जात होती त्याचबरोबर सर्वांसाठी लकी ड्रॉ गिफ्ट उखाणे स्पर्धा या सर्व गोष्टी यामध्ये नियोजित होत्या सुप्रिया झुरुंगे, शितल बडेकर, आशा बोरावके, वर्षा लकडे या मुलींच्या उखाण्यांना सर्व विद्यार्थ्यांनी दाद दिली त्याचबरोबर मुलांमध्येही बऱ्याच मुलांनी चांगले उखाणे घेतले संतोष राजगुरू, धवल गांधी, नवनाथ यादव, बापू शेळके हे काही कमी नव्हते मुलींच्या बरोबरीने त्यांनी उखाणे घेतले.
त्याचबरोबर सर्व मुलांनी मुलींनी आपली मनोगते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली त्यामध्ये बरेच भावुक झाले होते मनाला काही शब्द चटका लावून जात होते अनेकांचे डोळे भरून आले होते पण हा आनंदाचा क्षण प्रत्येकाला आपल्या डोळ्यात साचवायचा होता. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनाला धीर दिला होता, गप्पागोष्टी गाणी वीस वर्ष राहिलेला अबोला आज या मुलांनी पूर्ण करायचा ठरवला होता.त्यामध्ये संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या डान्स एकत्र स्नेहभोजन या गोष्टींनी आणखीच भर घातली असे वाटतच नव्हते की वीस वर्षे हे मित्र-मैत्रिणी एकमेकांपासून दूर राहिलेले आहेत आणि यांच्यात या वीस वर्षांमध्ये काही खंड पडलेला आहे या गोष्टी पूर्णपणे बाजूला राहिल्या होत्या.
सायंकाळचे पाच कधी वाजले या ५४ मित्र मैत्रिणींना कळालेच नाही महाराष्ट्राच्या चारी कोपऱ्यातून ते सर्व एकत्र आले होते पुढचा कार्यक्रम नियोजित होता शाळेमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना गिफ्ट शिक्षकांचा मानसन्मान शाळेला भेटवस्तू या गोष्टीचं नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते त्यानुसार सर्वांनी पाच वाजता शाळेमध्ये दाखल होऊन पुढील कार्यक्रम तेथे चालू झाला.
प्रथमता या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान माननीय मुख्याध्यापक मासाळ सर यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून स्वीकारले. यावेळी जे शिक्षक हयात नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रज्वलनाने आणि इतनी शक्ती हमे देना दाता की मन का विश्वास कमजोर हो ना हम चले नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल होना या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सोहळ्याचं अजून एक वैशिष्ट्य असं झालं होतं की सोहळ्याला आलेले जेवढे शिक्षक होते ते या शाळेचे आजी माजी मुख्याध्यापक होते. त्यामध्ये आदरणीय कुदळे मॅडम, जगताप मॅडम, सावंत सर, झिटे सर, पोमन सर हे होते. त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक भूपेंद्र शहा सर शिक्षक इतर कर्मचारी बापू तेलंग, कोळी भाऊ यांनी आपली उपस्थिती विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थिती लावली होती.
या ठिकाणीही मुलांनी मुलींनी आपली मनोगते अगदी उत्साहात मांडली. तब्बल वीस वर्षांनी शिक्षकांना भेटलेले विद्यार्थी आणि पुन्हा एकदा बारावीचा वर्ग भरलेला भास यावेळी होत होता. सर्व शिक्षकांचेही मार्गदर्शन त्यांची मनोगते ऐकून विद्यार्थी भारावून गेले होते. सर्व शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना कुदळे मॅडम यांनी अतिशय भाऊक होऊन सांगितले की इतक्या वर्षांनी तुम्हा बाळांना एकत्र पाहून माझं हृदय आनंदाने भरून आलेले आहे तुमचे हे यशाचं शिखर अजून अधिकाधिक उंच होत जावे हिमालयालाही तुमच्याकडे पाहून हेवा वाटेल असे यश तुम्हाला मिळावे तुम्हाला जेवढा आनंद आम्हाला भेटून झाला आहे त्यापेक्षाही माझ्या आनंदाला मर्यादा राहिली नाही सर्वजण असेच एकत्र रहा एकमेकांना वेळोवेळी मदत करत जा असा यावेळी त्यांनी आवर्जून संदेश दिला आणि शाळेची कधीतरी जाता येता आठवण काढत रहा असे अगदी भाऊक पणे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व आलेल्या मुला मुलींना प्रत्येकी गिफ्ट देण्यात आले आणि सायंकाळी ग्रुप फोटो काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मुलांमधून नवनाथ यादव,गणेश जराड, बापू शेळके‌,महेश पाटील,दीपक कदम, दिनेशपाटणे, संतोष राजगुरू, सचिन लाटकर, दीपक मुळीक, शहाजी पकाले,जमीर सय्यद,अजितदेशमुख,विक्रम दोरगे,सुभाष लोंढे,गणेश पवार,धवल गांधी‌ गहिनात पवार, मंगेश भोसले,मंगेश दोरगे,अण्णा दोरगे, सुरेश दोरगे,गणपत खुटवड‌,संदीप ठोंबरे,राहुल नवले,अरुण जगदाळे, राकेश शेलार, दीपक शेळके इत्यादी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. तर मुलींमधून
शितल बडेकर,नूर शेख, राणी दोरगे,
छाया इंगवले,वर्षा दोरगे,वैशाली दोरगे,आशा बोरावके‌, मेघा काटे सारिकाकळमकर,पदमा चोबे,सुरेखा कडू,स्वाती माळवदकर,कविता दोरगे,ज्योती तनपुरे, कीर्ती गरुड, स्नेहल आल्हाट,रोहिणी दोरगे, वर्षा लकडे,दिपाली शिंदे,लक्ष्मी जाधव‌ ,रूपाली भोंडवे,आशा कदम,सुनिता होले,मनीषा रायकर, सुप्रिया झुरुंगे,सुनिता शिंदे मनीषा वाबळे इत्यादी मुलींनी आवर्जून उपस्थिती लावली.
या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं ते बापू शेळके, नवनाथ यादव, संतोष राजगुरू, दिनेश पाटणे,महेश पाटील, अण्णा दोरगे, सचिन लाटकर, जमीर सय्यद, धवल गांधी, राकेश शेलार, गहिनीनाथ पवार, अजित देशमुख, गणेश जराड, शितल बडेकर, स्वाती माळवदकर, वर्षा लकडे, ज्योती तनपुरे, आशा बोरावके, सुप्रिया झुरुंगे , सुरेखा कडू, वर्षा दोरगे, रोहिणी दोरगे, दीपा शिंदे, छाया इंगवले मुला मुलींनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जराड व वर्षा लकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष राजगुरू यांनी केले.

भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; पोलीस अंमलदार सचिन पवार यांना विशेष महासंचालक सन्मानचिन्ह आणी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित.

0

भिगवण वार्ताहर.दि.२६

भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस अमलदार सचिन पवार यांना सन २०२३ चे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे विशेष सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र अमलदार पवार यांना प्रदान केले.

भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सचिन अशोक पवार हे २००७ साली पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाले. सन.२००९ ते सन.२०१५ या कालावधीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन येथे तर २०१५ ते २०२१ पर्यंत लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे.या सेवेदरम्यान त्यांनी खून ,खुनाचा प्रयत्न ,दरोडा ,दरोड्याचा प्रयत्न ,जबरी चोरी ,चोरी ,अमलीपदार्थ कारवाई ,अवैध गुटखा वाहतूक अशा विविध स्वरूपाच्या कारवाई मध्ये सहभाग नोंदविला आहे.तर अनेक गुन्ह्याचा उकल होनेकामी कारवाई केली आहे.सन २०२१ पासून अंमलदार सचिन पवार भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असून भिगवण परिसरातील अनेक पोलीस कारवाईत त्यांनी सहभाग नोंदविला आहे.याच त्यांच्या कार्याची दखल घेत मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पवार यांना सन्मान प्रदान केला.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार यांना शुभेच्छा दिल्या.

भिगवण बारामती रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा मृत्यू ; लामजेवाडी गावच्या हद्दीतील प्रकार

0

भिगवण वार्ताहर. दि. 22
भिगवण बारामती रोडवर लामजे वाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कोल्हा पाण्याचा शोध घेत असताना लामजेवाडी येथील वळणावर अज्ञात वाहणाची ठोकर लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असावा.बारामती भिगवण रोडचे नूतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी वाहणांचा वेग जास्त असतो.याचं वेळी पाण्याचा शोध घेत असताना हा अपघात घडला असून यात कोल्ह्याचा डोक्याच्या भागाला गंभीर जखमा होऊन यात त्याचा मृत्यू झाला.सदर कोल्हा मादी जातीचा असावा आणी त्याच्या पोटाच्या स्थितीवरून गर्भवती असण्याची शक्यता माहितीतील नागरिकाने दिली.याबाबत बारामती वन विभागाच्या अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.याची माहिती वनविभागाच्या टोल फ्री मदत केन्द्र येथे देण्यात आली आहे.

भिगवण बारामती रोडवर झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू !मदनवाडी पिंपळे घाटात अज्ञात वाहणाने ठोकल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता .

0

भिगवण वार्ताहर.दि.१२

भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात भिगवण येथील विशाल उर्फ भैया कैलास धवडे वय ४१ यांचा जागीच मृत्यू झाला.बारामती येथील खासगी कंपनीतून काम करून त्यांच्या ताब्यातील एम.एच.42 ए बी 9427 या दुचाकीवरून घरी येत असताना हा अपघात घडला.बारामती भिगवण रोडवरील पिंपळे घाटाच्या उतारापासून १०० मीटर अंतरावर बारामती दिशेला हा अपघात घडला.सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटनेची खबर अमर धवडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

बारामती भिगवण रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून अनेक दुचाकी स्वारांचे अपघात घडले आहेत.तर भिगवण येथील दोन तरुण यात दगावले आहेत.तर काहीना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते वेग मर्यादेचे सूचना फलक आणि पोलीस प्रशासनाने अपघात घडू नये यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.आज झालेल्या अपघातात मृत पावलेल्या धवडे यांचे शवविच्छेदन भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयात केले जाणार आहे.