Friday, May 22, 2026
Home Blog Page 25

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुरळा ;१७ पैकी १६ जागेवर विजय मिळवत श्रीनाथ ची विजयी पताका

0

भिगवण वार्ताहर . दीं.१८

इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतीमध्ये स्व. रमेश बापू जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १६ जागांवर मोठ्या फरकाने वर्चस्व स्थापन करत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलचा सुपडा साफ केला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानिमित्ताने प्रभाग क्र.१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदाच सुरुंग लागल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधील पराग जाधव यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला आहे.

भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक सुरुवातीपासूनच अत्‍यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये साम-दाम-दंड-भेद या आयुधांचा वापर केला गेला. ही निवडणूक स्व.रमेश जाधव यांच्या निधनानंतर ची पहिली निवडणूक असल्याने यामध्ये स्व.रमेश जाधव यांच्या सहानुभूतीचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षात केलेल्या भिगवण ग्रामपंचायतीमध्ये अंदाधुंदी कारभाराचा आणि संगीत खुर्चीचा फायदा श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलला झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याने व अनेक वादविवादाच्या घटना झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले होते. ही लढाई हर्षवर्धन पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वर्चस्वाची लढाई होती. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. प्रभाग क्र.१ व २ मध्ये तुषार क्षीरसागर यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीमध्ये अनेक माजी सरपंच-उपसरपंच यांचा पराभव झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय.. अशोक शिंदे

या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनल कडून मोठ्या प्रमाणात धनशक्ती आणि मनगटशाहीचा वापर करण्यात आला. परंतु, भिगवणच्या स्वाभिमानी जनतेने या सर्व धनशक्ती व हुकूमशाही मोडीत काढत हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथ पॅनेलला मोठ्या प्रमाणात मतदान केले. भिगवणच्या इतिहासात पहिल्यांदाच कुंचिकोरवे समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याने याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच मुस्लीम समाजाचे २ प्रतिनिधी देखील निवडून आले आहेत. आजचा हा विजय भिगवण कराच्या स्वाभिमानाचा आहे. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आहे. स्व. रमेश बापू जाधव यांना श्रद्धांजली म्हणून सर्व भिगवणकरांनी मतांचा अक्षरशः धो-धो पाऊस पडला आहे. हा विजय स्वर्गीय रमेश बापूंना श्रद्धांजली म्हणून अर्पण करीत आहे.

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली टक्के वारी ; एकूण मतदानाच्या ८० ट कके मतदान

0

इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले असून, भिगवण स्टेशन येथे उच्चांकी ८५ टक्के मतदान झाले आहे. एकूण १७ जागेसाठी ४३ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दि.१८ रोजी मतमोजणी होणार असून भिगवणकर नक्की कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत भिगवण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही अनेक कारणांनी गाजली. प्रचाराची खालावलेली पातळी, मोठ्या प्रमाणात झालेले लक्ष्मी दर्शन तर, काही ठिकाणी झालेल्या वादविवादाच्या घटना‌. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रीय झालेला पाहायला मिळाले. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा करण्यात येत असला असला तरी खरे चित्र हे १८ तारखेला समजणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रीनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख अशोक शिंदे यांनी सर्व भिगवणकर नागरिक आणि प्रशासनाचे आभार मानत कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहान केले.सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली होती.

  • दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून आपलीच सत्ता येणार असल्याचे बोलले जात आहे .
  • सत्ताधारी आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर हमखास निवडून येणार असल्याचे सांगत आहेत
  • विरोधी गटाकडून मतदार विजयाची माळ आपल्या च गळ्यात टाकणा र असल्याची ग्वाही देताना दिसून येत आहे.

भादलवाडी गावात डेंग्यू आजाराचा कहर ;आरोग्य विभागाकडून आऊट ब्रेक घोषित

0

आरोग्य विभाकडून तातडीने सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू

भादलवाडी वार्ताहर.दि.९

कोरोनाचा कहर कमी होतोय कि नाही तो पर्यंतच डेंगू आजाराने आपले डोके वर काढल्याने भादलवाडी गावात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले.आरोग्य विभागाने तातडीने या ठिकाणी सर्वेक्षण करीत भादलवाडी गावाला आऊट ब्रेक अर्थात डेंगूचा उद्रेक क्षेत्र म्हणून घोषित करीत उपाययोजना सुरु केल्या आहेत .

कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी होताच डेंगू सदृश आजाराच्या कहराला भादलवाडी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.बदलत्या हवामानामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे गावातील पुढारी आणि प्रशासन प्रचारात व्यग्र झाले आहेत. भादलवाडी सारख्या कमी लोकसंख्येच्या गावात १० च्या वर डेंगू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत.साथीच्या आजारातील रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक असताना काही खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर याची माहिती आरोग्य विभागाला देत नसल्यामुळे नेमकी आकडेवारी आरोग्य विभागाकडे मिळत नाही.तर गावात अनेक नागरिक ताप ,मळमळ ,डोकेदुखी आणि अंगदुखी असल्याच्या तक्रारी खासगी दवाखान्यात घेवून येत असल्याचे दिसून येत आहे.तर बऱ्याच रुग्णाचे डेंगू आजाराचे रिपोर्ट पौझीटिव्ह आले आहेत.याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने या गावात डेंगूचा उद्रेक झाला असल्याची घोषणा केली.तसेच आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे.काही ठिकाणी डासांच्या आळी मिळून आल्याने पाणीसाठे मोकळे करण्यात येत आहे.

तर काही ठिकाणी नागरिक सहकार्य करीत नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आशा सेविकांनी यावेळी केली..यावेळी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.गणेश पवार ,डॉ.कैलास व्यवहारे ,सामुदाय आरोग्य अधिकारी मृदुला जगताप ,हेमंत गावित,ग्रामसेवक तुषार लोंढे ,पोलीस पाटील तनुजा कुताळ,पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील वाबळे ,आरोग्य सहायक अशोक मोरे ,राजेंद्र डोळे ,आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांनी या ठिकाणी भेट दिली.

याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी सुनील गावडे यांनी भादलवाडी गावाला भेट देत आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनाची माहिती घेतली.तसेच तातडीने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्मचारी यांना सूचना केल्या.

अबब ९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५३ अर्ज ; बिनविरोध मध्ये वर्णी लागण्यासाठी उमेदवारांची गर्दी

0

भिगवण वार्ताहर. दि.३०

तक्रारवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९ जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या ५२ झाली असल्याची माहिती निवडणुक अधिकारी युनूस शेख यांनी दिली . बिनविरोध मध्ये आपली वर्णी लागेल याचा विचार करून फॉर्म भरण्याची लगबग होत असल्याचे जाणकार सांगत आहेत.

उजनी धरणाच्या किनार्‍यावर असलेल्या शेती आणि शेती पूरक व्यवसायात आपला नावलौकिक असणाऱ्या तक्रारवाडी गावात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.गावात सदस्य म्हणून नाव लागावे यासाठी अनेक जण निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.

३ हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या गावात १७२१ मतदार आहेत.तर या गावात शाळा आणि नोकरीच्या निमित्ताने राहत असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.गावात एकूण ३ प्रभागात मिळून ९ सदस्य पदासाठी ही निवडणुक लढविण्यात येत आहे.गेली १० वर्ष सत्तेत असणाऱ्या पॅनल विरोधात विरोधकांनी आपली ताकद लावली आहे.९ उमेदवारांना विरोधी गटाने ९ उमेदवार देणे गरजेचे असते मात्र उमेदवारी निश्चित करताना येणाऱ्या अडचणी आणि नाराजांची संख्या वाढू नये यासाठी दोनही बाजूने डमी उमेदवारी दिली जात आहे.

तर आपल्याला दोन्ही पार्टीने विश्वासात घेतले नाही म्हणून नाराज झालेल्या माजी सरपंचाने आपल्या सहकारी मित्राला सोबत घेत तिसऱ्या पॅनल ची तयारी करत आपले उमेदवार उभे केलेले आहेत.यामुळे १७२१मतदार असणाऱ्या गावात उमेदवारांची संख्या शेवटच्या दिवसापर्यंत ५२ पर्यंत गेल्याचे पहावयास मिळाले. उमेदवारी फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आज उमेदवारांनी गर्दी केली होती.

गावातील विकास कामे आणि तरुणाच्या बेरोजगारी याचा विसर सत्ताधारी गटाला पडल्यामुळे विरोधक मुद्दा लावून धरणार असल्याचे बोलले जात आहे.तर वर्षानुर्षांपासून सत्ता आपल्याच घरात ठेवत अनेकांना आश्वासनांचे गाजर दाखवून राजकारण करणाऱ्या विरोधात आपण पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे.

आता फॉर्म भरलेल्या ५२पैकी किती निवडणुकीच्या रिंगणात शेवट पर्यंत टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे पाहणे गरजेचे आहे.मात्र सरपंच आरक्षण मागे घेतल्याने कराव्या लागणाऱ्या खर्चाचा मेळ बसविणे पॅनल प्रमुखासाठी डोके दुखी ठरणार हे मात्र निश्चतच…

डेंग्यू आजाराने तक्रारवाडी गावच्या तरुणाचा मृत्यू

0

भिगवण वार्ताहर.दि.२९

तक्रारवाडी गावातील तरुण हॉटेल व्यावसायिक अमोल मोहन देसाई वय ३२ यांचे डेंगू सदृश आजाराने निधन झाल्याची घटना सोमवारी घडली.डेंगू आजाराने मृत्यू झाल्याने भिगवण परिसरात खळबळ माजली असून या आजाराची भीती नागरिकांत पसरली आहे.

कोरानाच्या आजाराने थैमान घातले असतानाच इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू आजारानेही डोके वर काढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर आरोग्य प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोरोनाच्या आजारात गुंतले असल्याचे सांगत इतर आजाराविषयी कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. त्यामुळे भिगवण परिसरातील खासगी दवाखान्यात पुन्हा गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारवाडी गावातील अमोल देसाई या तरुणाला गेल्या आठवड्यात ताप येत असल्यामुळे भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत पुढील उपचारासाठी बारामती येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते.तर पुढे त्याला पुणे येथील खासगी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.धडधाकट आणि निरोगी असणाऱ्या अमोलला अचानक आलेल्या तापाने जीव गमवावा लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे.अमोलच्या पाठीमागे त्याची पत्नी आई आणि लहान मुली असा परिवार आहे.

अमोल याचा जीव वाचावा यासाठी तक्रारवाडी गावातील तरुणांनी एकत्र येत मदतीचा हात दिला. दवाखाना खर्चा साठी मदतीचे आवाहन करताच सर्वांनी पुढे येत आपल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न केला .मात्र गावातील तरुणाच्या या मदतीला यश मिळाले नाही आणि अमोल मित्रांना सोडून देवा घरी गेला.

गावातील तरुणाचा मृत्यू होवूनही ग्रामपंचायत प्रशासन निवडणुकीच्या धामधुमीत मश्गुल असल्याने कोणत्याही प्रकारची फवारणी अथवा जनजागृती केली जात नाही.तसेच आरोग्य विभागही कोरोनाच्या नावाखाली इतर आजार पळून गेल्यासारखे वागत असल्याचे दिसून येत आहे.

भिगवन शेटफळगडे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ची उडी;तालुका अध्यक्ष शरद चितारे यांची माहिती

0

भिगवण वार्ताहर . दि.२८

इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या बरोबर च आता वंचित बहुजन आघाडी ने उडी घेत निवडणुकीत रंगत वाढवली आहे .
भिगवण- शेटफळ गढे जिल्हा परिषद गटातील ९ ग्रामपंचायत निवडणुका इतर समविचारी संघटनांना बरोबर घेऊन लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष शरद चितारे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

यावेळी बोलताना शरद चितारे यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या विरुद्धची ही लढाई आहे. अनेक वेळा दोन्ही पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जात नसून, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम हे दोन्ही पक्ष करीत आहेत त्यामुळे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संधी देण्यात येणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रभागात उमेदवार उभे करणार असल्याचे देखील घोषित केले. यावेळी भिगवण मधील प्रभाग २ मधून हेमंत निंबाळकर व अमोल पाचांगणे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. व भादलवाडी येथून नितीन पिसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
” आपला जाहीरनामा हा सर्व सामान्य नागरिकाच्या हिताचा असेल असे सांगितले.पिण्याचे पाणी रस्ता आणि शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिक यांच्या पर्यंत पोहोचविणे प्रथम काम असेल असे चीतारे यांनी सांगितले.”

या पत्रकार परिषदेसाठी हेमंत निंबाळकर, अमोल पाचांगणे, संदीप वाघमारे, महेश चितारे, विजय धवडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे आयोजन वंचित आघाडी यांच्या वतीने शरद चीतारे यांनी केले.यावेळी नितीन पिसे यांनी आभार व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुका जातीपातीच्या आणि भावकीच्या आधारावर होऊ नयेत; भास्कर पेरे पाटील

0

बारामती वार्ताहर दि.२६

ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका, असे आवाहन पाटोदाचे (जि. औरंगाबाद) आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये ७४८ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. गावागावामध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला आहे.तर काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी व गाव पुढारी प्रयत्न करतानाचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्याशी संवाद साधला.पेरे-पाटील म्हणाले, सत्यवार्ता न्यूजआईला गर्भ राहिल्यापासून ते मनुष्याच्या मरणापर्यंत ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करीत असते. सेवा-सुविधा पुरवित असते. गावकी-भावकीच्या राजकारणात आपण आपले भविष्य पुसून टाकत आहोत. राज्य शासन, केंद्र शासनाच्या ग्रामपंचायतीसाठी शेकडोने योजना आहेत. मात्र यामधील किती योजना आपल्याला माहिती आहेत. जात, धर्म यामधून जे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ते आपण अजून मिटवू शकलो नाही. ते प्रश्न जैसे थे असताना दररोज नवनवीन सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.प्रदुषण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, वीज, शेतमाल प्रक्रिया, रोजगार, आरोग्य, महिला सबलीकरण अशा अनेक विषयांवर काम करण्याची गरज आहे. गावच्या भल्यासाठी चार माणसे बसून गावातील अंतर्गत विरोध मिटवत असतील व ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे अमिष दाखवून कोणी ग्रामपंचायत बिनविरोध करू पाहत असेल तर निवडणुक व्हायला हवी. ही निवडणुक निकोप असावी. गावाच्या भल्यासाठी कोणी झटू पाहत असेलत तर अशा होतकरू व्यक्तीला जात, भावकी, धर्म विसरून ग्रामस्थांनी साथ द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली चुरस ;

0

सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल विरोधात स्वर्गवासी रमेश बापू जाधव प्रेरित सर्वपक्षीय श्रीनाथ ग्राम विकास पॅनल

भिगवण वार्ताहर दि.२६
इंदापूर तालुक्यात राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल च्या विरोधात सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर अपक्ष उमेदवारांना वळती वर आनण्यासाठी दोन्ही पार्ट्यांना मोठी कसरत करावी लागणार हेही निश्चित झाले आहे.
भिगवण गावावर पंचवीस वर्षापासून स्व.रमेशबापू जाधव यांची एक हाती सत्ता होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना एकत्र करीत ‘ ‘एक बदल घडवा सर्व बदल घडतील’ अशी हात देत सत्ता काबीज केली होती. सत्ता मिळाल्यानंतर सर्व सदस्यांना सरपंच उपसरपंच पद मिळावे यासाठी राष्ट्रवादीने पद बदलीचा कार्यक्रम राबवला. मात्र विरोधकांनी या पद बदलाला संगीत खुर्ची उपमा देत टीकेची झोड उठवली. आणि विकास कामात सदस्य मंडळी करीत असलेल्या ठेकेदारी बाबत टार्गेट केले.
या दोन्ही पार्ट्या करीत असलेल्या आरोप-प्रत्यारोप यांच्यात दिवसेंदिवस रंगत वाढत असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आणखीन काय आरोप केले जातात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून आहे .तर सत्ताधारी पक्ष हा आपण केलेल्या विकास कामावर ठाम असून मतदार हा विकासकामांना नक्की मत देईन असा दावा करीत आहे.
तसेच भाजप हा पक्ष लपवण्यासाठीच विरोधक सर्वपक्षीय पॅनल असल्याचा आव आणत असल्याचे सत्ताधारी पॅनल प्रमुख अँड .महेश देवकाते यांनी म्हटले आहे.
श्रीनाथ ग्रामविकास पॅनलचे पराग जाधव भिगवन गावातील ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपला पॅनल निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगत आहेत.
…….. *दोन्ही पार्ट्या विकासाच्या नावाने मत मागत असले तरी वाढत्या अतिक्रमणामुळे भिगवण गावचा कोंडलेला श्वास कोण मोकळा करणार ? याकडे मतदार राजा डोळे लावून बसलेेला आहे*

शहरातील रहिवासी भागातच सुरू होता चक्क कुंटणखाना

0

भिगवन पोलीसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत एका तरुणीसह महिलेची केली सुटका .

भिगवण प्रतिनिधी. दि.२५ भिगवण शहरातील गजबजलेल्या रहिवाशी परिसरात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखाण्यावर भिगवन पोलिसांनी छापा टाकीत दोन पीडित महिलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत रोख रकमेसह २८ हजार ५०० रुपयांचा जप्त केला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिगवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना गोपनीय सूत्राकडून पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत या ठिकाणी तातडीने छापा टाकला. यावेळी आरोपी मिनीनाथ रमेश गायकवाड वय २८ राहणार मदनवाडी मुळ. भगतवाडी तालुका करमाळा ,रोहिदास गंगाराम दराडे वय २९ राहणार अकोले हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी २० वर्षाची तरुणी आणि ४० वर्षाची महिला यांच्याकडून अवैधपणे कुंटणखाना चालवीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल आणि रोख रक्कम मिळून २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

सदर कारवाई पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे, नाना वीर, इंकलाब पठाण ,महिला पोलीस नाईक सारिका जाधव या पथकाने केली.

पुणे-सोलापूर महामार्गावरील गजबजलेल्या रहिवासी भागात सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती या परिसरातील नागरिकांना नव्हती हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

तर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना याठिकाणी अवैध व्यवसाय चालवणाऱ्या आरोपींची मानसिकता नेमकी काय? याचा उलगडा होत नाही.

सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

0

पिंपळे गावातील हृदयद्रावक घटना

भिगवण वार्ताहर दि. २४

घरच्यांना न सांगता दुसऱ्याच्या वाहनातून परगावी फिरण्यास गेल्याच्या कारणावरून आई-वडिल रागावल्याचा राग मनात धरत पिंपळे ( ता .इंदापूर) गावातील १३ वर्षाच्या अल्पवयीन बालकाने गळफास घेतलेची घटना घडली. एकुलत्या एका मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे पिंपळे गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळे गावातील कृष्णा भगवान चोरमले वय वर्षे 13 असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सातवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णाने घरातील आईच्या साडीने कॉटवर उभे राहत घरातील लोखंडी अँगल ला गळफास घेतल्याची घटना घडली. याबद्दल माहिती घेत असताना कृष्णा बुधवारी गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर बसून इंदापूर ला गेला होता याची माहिती कोणालाही नव्हती .त्यामुळे घरातल्यांनी त्याला चिडून याची विचारणा केली याचाच राग मनात धरून कृष्णा याने आई वडील कामाला गेल्यानंतर हे कृत्य केले.

कृष्णा हा चोरमले कुटुंबासाठी एकुलता एक मुलगा आणि त्याच्या पाठीशी एक बहीण असा परिवार आहे कृष्णाची आई शेतीच्या कामासाठी बाहेर गेली होती तर वडील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी बाहेर गेले होते काल झालेला प्रकार मनात ठेवूनच कृष्णा यांनी हे कृत्य केले असल्याची चर्चा गावकरी करीत आहेत.
याबाबत अमित सदाशिव चोरमले यांनी भिगवण पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. भिगवण पोलीस यांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करत शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदापूरला पाठवला आहे.घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षण घेत असताना गावातील पद्मावती मंदिरात ढोल वाजवून पैसे कमावणारा कृष्णा अचानक गेल्याने पिंपळे गावकरी हळहळ व्यक्त करीत होते.
“कोरोणामुळे बंद असणाऱ्या शाळा जर चालू असत्या तर आजचा प्रकार कदाचित घडला नसता. हा प्रकार अत्यंत वेदनादायी असून एक हुशार आणि चुणचुणीत मुलगा अचानक निघून गेल्याची” खंत त्याला शिकवणारे शिक्षक यांनी व्यक्त केली.