” बैल गेला आणि झोपा केला “; उजनीतील अवैध माती उपसा बाबंत जलसंपदा विभागाची पोलीस कारवाई

0
465

लाखो रुपयांची माती ओरबाडून लुटल्या नंतर जलसंपदा विभागाला आली जाग ; माती माफिया सोबतच शासकीय कर्मचारी मालामाल झाल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती ?

भिगवण वार्ताहर.दि.१६

उजनी धरणातील अवैध माती उपसा प्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा हा “ बैल गेला आणि झोपा केला ” या म्हणी प्रमाणे असल्याचे मत उजनी किनारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.तर पाउस सुरु झाल्यावर करण्यात आलेली कारवाई नुरा कारवाई आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

उजनी धरणाच्या तक्रारवाडी ,कुंभारगाव ,राजेगाव ,खाणावटे पाणलोटक्षेत्रात  गेल्या महिनाभरा पासून दिवस रात्र माती उपसा केली जात आहे.याबाबत कोणी चौकशी करायला गेले तर माती शेतात भरण्यासाठी जलसंपदा विभागाने परवानगी दिली असल्याचे आणि त्याची रीतसर रॉयल्टी भरली असल्याचे सांगितले जाते.मात्र खर तर हि माती राज्यातील वीट व्यावसायिकांना पोहोच केली जात असल्याचे वास्तव आहे.तर १०० ब्रास ची परवानगी काढून हजारो ब्रास माती उचलली जात असताना सबंधित विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते .याच्या पाठीमागे यातील अधिकाऱ्यांना शासकीय खनिज चोरीबाबत जागरुकता अगर शेतकऱ्यांचा कळवला नसून आर्थिक तडजोडी हे कारण असल्याचे बोलले जात आहे.अनेकांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी करूनही हा विभाग हजारो ब्रास माती ओरबाडून नेल्या नंतर आणि पावसाने माती उपसा बंद झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जात चोरीची तक्रार करत असेल आणि ती हि अज्ञात चोरा विरोधात ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

उजनी धरणातील पाणी खाली गेल्या कुंभारगाव ,तक्रारवाडी ,राजेगाव,डिकसळ ,खानावटे गाळ पेर क्षेत्रातून माती उपसा करून ती वीट व्यावसायिकांना विकली जाते.याच्या पाठीमागे लाखो रुपयाचे अर्थकारण असल्याचे वास्तव आहे .त्याच्यासाठी माती माफिया आपल्या ओळखीच्या अधिकाऱ्यांशी संधान साधित तुटपुंजी ब्रास मातीची परवानगी मिळवीत उजनी ओरबाडून काढली जाते.

उजनीतील माती उचलण्यावरून अनेकवेळा तरुणांच्या टोळक्याची भांडण होवून माती रक्तरंजित झालेली असली तरी प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही

याबाबत जलसंपदा विभागाचे भिगवन विभागाचे अधिकारी संजय मेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कार्यक्षेत्रातील अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे पदभार आपण स्वीकारला असल्याचे सांगितले.तर कारवाई करण्यास उशीर झाल्याचे मान्य करीत आपल्या विभागाने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून तपास करणे पोलीस विभागाचे काम असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here