आरोग्य विभाकडून तातडीने सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू
भादलवाडी वार्ताहर.दि.९
कोरोनाचा कहर कमी होतोय कि नाही तो पर्यंतच डेंगू आजाराने आपले डोके वर काढल्याने भादलवाडी गावात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले.आरोग्य विभागाने तातडीने या ठिकाणी सर्वेक्षण करीत भादलवाडी गावाला आऊट ब्रेक अर्थात डेंगूचा उद्रेक क्षेत्र म्हणून घोषित करीत उपाययोजना सुरु केल्या आहेत .
कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी होताच डेंगू सदृश आजाराच्या कहराला भादलवाडी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.बदलत्या हवामानामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे गावातील पुढारी आणि प्रशासन प्रचारात व्यग्र झाले आहेत. भादलवाडी सारख्या कमी लोकसंख्येच्या गावात १० च्या वर डेंगू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत.साथीच्या आजारातील रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक असताना काही खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर याची माहिती आरोग्य विभागाला देत नसल्यामुळे नेमकी आकडेवारी आरोग्य विभागाकडे मिळत नाही.तर गावात अनेक नागरिक ताप ,मळमळ ,डोकेदुखी आणि अंगदुखी असल्याच्या तक्रारी खासगी दवाखान्यात घेवून येत असल्याचे दिसून येत आहे.तर बऱ्याच रुग्णाचे डेंगू आजाराचे रिपोर्ट पौझीटिव्ह आले आहेत.याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने या गावात डेंगूचा उद्रेक झाला असल्याची घोषणा केली.तसेच आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे.काही ठिकाणी डासांच्या आळी मिळून आल्याने पाणीसाठे मोकळे करण्यात येत आहे.
तर काही ठिकाणी नागरिक सहकार्य करीत नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आशा सेविकांनी यावेळी केली..यावेळी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.गणेश पवार ,डॉ.कैलास व्यवहारे ,सामुदाय आरोग्य अधिकारी मृदुला जगताप ,हेमंत गावित,ग्रामसेवक तुषार लोंढे ,पोलीस पाटील तनुजा कुताळ,पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील वाबळे ,आरोग्य सहायक अशोक मोरे ,राजेंद्र डोळे ,आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांनी या ठिकाणी भेट दिली.
याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी सुनील गावडे यांनी भादलवाडी गावाला भेट देत आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनाची माहिती घेतली.तसेच तातडीने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्मचारी यांना सूचना केल्या.