भिगवन वार्ताहर. दि . ७
तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावात अतिक्रमणाचा कहर वाढला असून अतिक्रमण करणाऱ्यांनी आता खाजगी मिळकतदारांचे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण केले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.
उजनी धरणाच्या निर्मिती वेळी पुनर्वसित झालेल्या तक्रारवाडी गावाला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला असून दिवसेंदिवस या अतिक्रमणामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता गावातील मिळकत धारकाला आपल्या घराच्या जागेवर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने राजेंद्र गोडसे या नागरिकाला चक्क आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. गावातील पुढारी आपल्या राजकारनाची पोळी भाजली जावी यासाठी अतिक्रमणा खतपाणी घालत असल्याचा गोडसे यांचा आरोप आहे.तर ग्रामंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक अतिक्रमण करणाऱ्या ना पाठबळ देत असल्याचे म्हणणे आहे.

तक्रारवाडी ग्रामपंचायतीसमोर गोडसे यांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत आपल्या जागे समोरील अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे यांचे म्हणणे आहे. गोडसे यांच्या म्हणण्यानुसार तक्रारवाडी गावातील शासकीय जागेत शरद संपतराव वाघ , शशिकांत संपतराव वाघ या दोघांनी पक्के बांधकाम केले असून शासकीय जागेचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. तर युवराज उत्तम काळगे, विकास संजय वाघ यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून जनावरांचा गोठा व त्याचे शेणखत टाकून ताबा घेतलेला आहे त्यामुळे गोडसे यांना त्यांच्या जागेवर जाण्यासाठी प्रतिबंध होत असून सदर इसम दहशत निर्माण करीत आहेत तसेच दमदाटी आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार केला जात आहे .

याबाबत गोडसे यांनी उपविभागीय कार्यालय तहसीलदार कार्यालय तसेच गट विकास अधिकारी भिगवण पोलिस स्टेशन यांना याबाबत निवेदन दिले असून ग्रामपंचायत तक्रारवाडी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.
तक्रारवाडी गावात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून पुढारी आपल्या स्वार्थासाठी नागरिकात फूट पाडण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे .दिवसा अतिक्रमण करणार्यांना साथ देताना रात्री ज्यांना अतिक्रमणाच्या त्रास होत आहे अशांना उपोषणाचे मार्ग सुचविले जात आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी होण्याची गरज निर्माण झाली असून अशा पुढाऱ्यांना आपली जागा दाखवण्याची वेळआलेली आहे.