भिगवण वार्ताहर . दीं.१८
इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतीमध्ये स्व. रमेश बापू जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १६ जागांवर मोठ्या फरकाने वर्चस्व स्थापन करत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलचा सुपडा साफ केला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानिमित्ताने प्रभाग क्र.१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदाच सुरुंग लागल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधील पराग जाधव यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला आहे.
भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये साम-दाम-दंड-भेद या आयुधांचा वापर केला गेला. ही निवडणूक स्व.रमेश जाधव यांच्या निधनानंतर ची पहिली निवडणूक असल्याने यामध्ये स्व.रमेश जाधव यांच्या सहानुभूतीचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षात केलेल्या भिगवण ग्रामपंचायतीमध्ये अंदाधुंदी कारभाराचा आणि संगीत खुर्चीचा फायदा श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलला झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याने व अनेक वादविवादाच्या घटना झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले होते. ही लढाई हर्षवर्धन पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वर्चस्वाची लढाई होती. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. प्रभाग क्र.१ व २ मध्ये तुषार क्षीरसागर यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीमध्ये अनेक माजी सरपंच-उपसरपंच यांचा पराभव झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय.. अशोक शिंदे
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनल कडून मोठ्या प्रमाणात धनशक्ती आणि मनगटशाहीचा वापर करण्यात आला. परंतु, भिगवणच्या स्वाभिमानी जनतेने या सर्व धनशक्ती व हुकूमशाही मोडीत काढत हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथ पॅनेलला मोठ्या प्रमाणात मतदान केले. भिगवणच्या इतिहासात पहिल्यांदाच कुंचिकोरवे समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याने याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच मुस्लीम समाजाचे २ प्रतिनिधी देखील निवडून आले आहेत. आजचा हा विजय भिगवण कराच्या स्वाभिमानाचा आहे. गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आहे. स्व. रमेश बापू जाधव यांना श्रद्धांजली म्हणून सर्व भिगवणकरांनी मतांचा अक्षरशः धो-धो पाऊस पडला आहे. हा विजय स्वर्गीय रमेश बापूंना श्रद्धांजली म्हणून अर्पण करीत आहे.